सद्गुरू
प्रश्न : जे लोक यशस्वी आहेत ते सगळेच बुद्धिमान नाहीत. सगळे बुद्धिमान लोक यशस्वी नाहीत. असे का आहे?
सद्गुरू : सर्वांत प्रथम आपल्याला हे ठरवायला हवे, की यश म्हणजे नेमके काय? तुमच्यासाठी यशाची संकल्पना काय आहे? कदाचित आत्ता सध्या भारतीय मापदंडानुसार, तुम्ही विचार करत असाल, की जर तुमच्याकडे दहा कोटी रुपये असतील, तर तुम्ही खूप यशस्वी आहात. कदाचित दुसरीकडे कुठेतरी दहा कोटी रुपये हे काही मोठे यश नसू शकते. कदाचित तुमच्या पणजोबांकडे फक्त हजार रुपये होते; पण ते तुमच्या गावात किंवा तुमच्या शहरात सर्वांत यशस्वी व्यक्ती होते. आज, प्रत्येक मजुराकडे हजार रुपये आहेत. त्याला यशस्वी मानले जात नाही.
म्हणून, यश हा एक सामाजिक मापदंड आहे आणि त्याचा मानवाच्या मूलभूत बुद्धिमत्तेशी काहीही संबंध नाही. बुद्धिमत्ता ही एक अशी गोष्ट आहे, जी जीवनात स्वतःच स्वतःचा मार्ग शोधून काढते. जीवनात स्वतःचा मार्ग शोधून काढणे याचा अर्थ समाजाची मान्यता मिळवणे असा असणे गरजेचे नाही. एखाद्या बुद्धिमान व्यक्तीने स्वतःसाठी कदाचित असा एक मार्ग शोधून काढला असेल, जो इतर लोक पाहूसुद्धा शकणार नाहीत.
सामाजिक आणि आर्थिक यश हे एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत, त्याच्या बुद्धिमत्तेशी काहीही संबंध नसतानाही घडून येऊ शकते, कारण इतिहासाच्या वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या समाजात अनेक प्रवाह आणि परिस्थिती घडत असतात. आत्ता सध्या आयटीची लाट चालू आहे. जो कोणी आयटी कंपनी सुरू करतो, तो यशस्वी होतो. याचा अर्थ असा नाही, की जो कोणी दुसऱ्या प्रकारचा उद्योग चालवत आहे आणि परिस्थिती योग्य नसल्यामुळे संघर्ष करत आहे, म्हणून तो बुद्धिमान नाही. तर, सामाजिकदृष्ट्या यशस्वी असणे हे विविध प्रकारच्या संधी आणि विविध परिस्थिती यावर अवलंबून असते आणि निश्चितपणे, ते एखाद्याच्या बुद्धिमत्तेवरून ठरत नाही; पण जीवनाच्या दृष्टीने यश - तुम्ही स्वतःच्या आतमध्ये आणि स्वतःच्या बाहेर किती यशस्वी आहात - हे निश्चितपणे एखाद्याच्या बुद्धिमत्तेवर ठरते. बुद्धिमत्तेशिवाय यश प्राप्त होऊ शकत नाही.
जर एखाद्या व्यक्तीला समाधानी जीवन जगायचे असेल, तर त्यासाठी काही ठरावीक प्रमाणाची बुद्धिमत्ता गरजेची आहे. बुद्धिमत्ता म्हणजे शिक्षण किंवा गोळा केलेले ज्ञान नव्हे. बुद्धिमत्ता म्हणजे मुळात, जीवनातून मार्ग काढण्यासाठी आणि जीवन जसे आहे तसे पाहण्यासाठी तुमची बुद्धी पुरेशी धारदार आहे. जोपर्यंत तुम्ही जीवन जसे आहे तसे पाहत नाही, तोपर्यंत तुम्ही जाणीवपूर्वक कृती करू शकत नाही. तुम्ही केवळ योगायोगानेच कृती कराल. म्हणून जीवन जाणीवपूर्वक आणि स्पष्टतेने जगण्यासाठी बुद्धिमत्ता अत्यंत महत्त्वाची आहे, कारण बुद्धिमत्तेशिवाय स्पष्टता असू शकत नाही.