Sanjay Raut : अभिषेक कौल कोण? नाशिकमधल्या संभाव्य, मोठ्या भूकंपाआधी राऊतांचा पलटवार
GH News June 04, 2025 02:07 PM

“देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. काही महापालिकेच्या कामासंदर्भात बडगुजर भेटले असतील. आमच्यासारखे काही कडवट शिवसैनिक अशा भेटीगाठी टाळतात. संशय निर्माण होईल अशा भेटी टाळायच्या असतात. कोणाला भेटण्याची इच्छा असेल तर त्या इच्छेविरोधात कोणी कायदा आणलेला नाही” असं संजय राऊत सुधारकर बडगुजर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल बोलले. “नाशिकमध्ये मीडियातून ज्या बातम्या येत आहेत, तसं नाहीय. एखाद-दुसऱ्या व्यक्तीने नाराजी व्यक्त केली, म्हणून संपूर्ण शिवसेनेत फाटाफूट आहे. व्यक्ती म्हणजे शिवसेना नाही. त्या व्यक्तीला नाराजी व्यक्त करण्याइतपत प्रतिष्ठा त्या पक्षाने दिलेली असते” असं संजय राऊत म्हणाले.

“आज पक्ष अडचणीत आहे. लोकांना लाभ हवे आहेत. त्या लाभासाठी लोक पक्ष बदलत आहेत. कोणत्या महान विचाराने कोणी पक्ष सोडला असेल तर माल सांगाव. नाराजीच म्हणालं, तर एकनाथ शिंदे शिवसेनेत पण नाराज होते. आता देवेद्र फडणवीसांसोबत सुद्धा नाराज आहेत, त्याचा चेहरा पहा. फक्त अजित पवार कधी नाराज दिसत नाही ते त्यांचं कौशल्य आहे. अजित पवार मला कधी नाराज दिसले नाहीत. उद्धव ठाकरेंसोबत अजित पवार सर्वाधिक खूश होते” असं संजय राऊत म्हणाले. “सुधाकर बडगुजर म्हणजे नाशिकची शिवसेना नाही. ते आमचे सहकारी आहेत. या क्षणी ते शिवसेनेत आहेत. त्यावर मला काही बोलायच नाही” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

गिरीश महाजन यांच्यावर काय आरोप केले?

संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप केले. ते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील सर्वात भ्रष्ट मंत्री असल्याचा आरोप केला. “भाजपचे लोक आहेत किंवा शिंदे गटाचे लोक यांचा एकच अजेंडा आहे, पक्ष फोडणं. ते आपल्या मंत्रालयात काम करतायत का? महाजन यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय आहे. त्यांना मंत्रिमंडळात घेण्याला केंद्रीय समितीचा विरोध होता. कारण भ्रष्टाचार आणि इतर प्रकरण आहेत” असा दावा संजय राऊत यांनी केला.

अभिषेक कौल कोण?

गिरीश महाजन यांच्या कार्यालयातील अभिषेक कौल कोण आहे? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. “अभिषेक कौल हा ठेकेदार, बिल्डर आहे. तो गिरीश महाजन यांच्या कार्यालयात बसतो. त्याचा फोन आल्याशिवाय गिरीश महाजन आपत्ती व्यवस्थापनाची कोणतीही फाईल मंजूर करत नाहीत” असा दावा संजय राऊत यांनी केला.

मंत्रालयात 350 फाईल पडून

“हा अभिषेक कौल सगळे व्यवहार बाहेर करतो. आपत्ती व्यवस्थापन सामन्य माणसाशी संबंधित खातं आहे. महाजन यांच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयात 350 फाईल पडून आहेत. कारण व्यवहार अजून व्हायचे आहेत. सगळे व्यवहार गिरीश महाजन यांनी नेमलेला कौल करतो. फडणवीस यांनी त्यांच्याभोवती जे साधू-संतांच महामंडळ जमा केलय, त्यातले एक साधू संत म्हणजे गिरीश महाजन आहेत” असा आरोप संजय राऊत यांनी केला.

‘हा फडणवीस करत असलेला भ्रष्टाचार’

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत धारावी पूनर्विकास प्रकल्पासाठी मदत डेअरीची जागा देण्याचा निर्णय झाला. त्यावर राऊत म्हणाले की, “हा मुंबईतला सगळ्यात मोठा घोटाळा आहे. मदर डेअरची 17 हेक्टर जमीन अदानीच्या घशात जात आहे. यावर उद्धव ठाकरेंनी सर्वप्रथम आवाज उचलला, मोर्चे काढले. मुंबईतला प्रत्येक मोकळा भूखंड धारावीच्या नावाखाली गौतम अदानीला देणं हा फडणवीस करत असलेला भ्रष्टाचार आहे, त्याला नरेंद्र मोदींची साथ आहे”

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.