मुंबई : या आठवड्याच्या शेवटी बकरी ईद सण येणार असल्यामुळे मुस्लिम नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. देशभरात 7 जून रोजी बकरी ईद साजरी केली जात असतानाच महाराष्ट्र गौसेवा आयोगाने आठवड्याभरासाठी पशू बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र गौसेवा आयोगाच्या निर्णयामुळे राज्यातील वातावरण तापताना दिसत आहे. विरोधक आक्रमक झाले असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी आता राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. (Nitesh Rane advises changing surname after Aditya Thackeray criticizes decision to close cattle market during Bakri Eid)
आदित्य ठाकरे यांच्या टीकेसंदर्भात प्रश्न विचारला असता नितेश राणे म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी आपलं आडनाव ठाकरे बदलून घेतलं पाहिजे. त्यांनी आपलं नाव आदित्य खान आणि आदित्य शेख केलं पाहिजे. त्यांना ते जास्त शोभून दिसेल. कारण बाळासाहेबांचा नातू जर अशा पद्धतीने बोलणार असेल, तर तो ठाकरे आडनाव वापरण्याच्या लायकीचा नाही, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली.
हेही वाचा – Rohit Pawar : उद्या अजितदादांना ग्रामपंचायत निवडणुकीतही…; रोहित पवारांनी लगावला टोला
महाराष्ट्र गौसेवा आयोगाच्या निर्णयावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले होते की, मी सुद्धा पर्यावरणप्रेमी आहे, पण कधी पाणी वाचवा, कधी रंग वाचवा, आता हे (बकरा) वाचवा, निदान आम्हाला श्वास तरी घेऊ द्या. सणांमध्ये हस्तक्षेप करणे हे सरकारचे काम नाही. सरकारचं खरं काम आहे, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणे, पावसाचे पाणी घरात शिरत आहे का? ते तपासणे आणि पहलगाम येथे आलेल्या 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांना शोधणं आहे. महाराष्ट्र गौसेवा आयोगाच्या बकरी ईदसंदर्भातील सूचनांमुळे हा मुद्दा तापला आहे. आयोगाने 3 ते 8 जूनपर्यंत राज्यातील पशु बाजार बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात असंतोष निर्माण झाला आहे. अनेक राजकीय पक्षांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या निर्णयाविरुद्ध आपला आक्षेप नोंदवला आहे. 7 जून रोजी देशभरात बकरी ईद साजरी केली जाणार आहे. मात्र त्यापूर्वी बाजारपेठा बंद करण्याच्या घोषणेमुळे पशुपालक आणि शेतकरी चिंतेत पडले आहेत. विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की, शेतकरी या सणासाठी महिनोमहिने जनावरांची काळजी घेतात आणि अशा परिस्थितीत, बाजार बंद करण्याचा अचानक घेतलेला निर्णय त्यांच्यासाठी आर्थिक संकट निर्माण करू शकतो, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली होती.
हेही वाचा – Sushama Andhare : निर्णय मनसे अध्यक्षांनाच घ्यायचाय, पण…; ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत काय म्हणाल्या अंधारे?