बंगळूर : बंगळूरमध्ये (RCB) समारंभात झालेल्या चेंगराचेंगरीबाबत (Bangalore Stampede) कर्नाटक सरकारने स्पष्टीकरण दिले आहे की, ‘खेळाडूंना दुसरे काम करायचे होते. तसेच परदेशी खेळाडूंना त्या रात्री देश सोडावा लागला. म्हणूनच, आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
याबद्दल माहिती देताना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Karnataka CM Siddaramaiah) यांचे राजकीय सचिव नासिर अहमद म्हणाले, ‘आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी जमलेल्या गर्दीची संख्या अनपेक्षित होती. फक्त ३० हजार लोकांची क्षमता असलेल्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दोन-तीन लाख लोक आले होते. कोणीही याची कल्पनाही करू शकत नव्हते. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खूप कमी वेळ होता, त्याची घोषणा करण्यात आली नव्हती.
सामना मंगळवारी (ता. ३) संपला, पण आज उत्सव आयोजित करण्यात आला. कारण, खेळाडूंना इतर गोष्टी करायच्या होत्या. विदेशी खेळाडूंना रात्री देश सोडायचा होता. म्हणून आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तथापि, खूप कमी वेळात, शक्य तितकी सर्वोत्तम व्यवस्था करण्यात आली, असे ते म्हणाले. दरम्यान, आज हा उत्सव का साजरा करण्यात आला, असे विचारले असता नासिर अहमद म्हणाले, परिस्थिती अशी होती की, आरसीबीच्या अनेक खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना इतर काम करायचे होते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, परदेशी खेळाडूंना त्यांच्या पुढील क्रिकेट मालिकेत सहभागी होण्यासाठी आज (ता. ४) देश सोडावा लागला. त्यामुळे संघाच्या फ्रँचायझीने आज एक उत्सव कार्यक्रम आयोजित केला. परदेशी खेळाडूदेखील बुधवारी (ता. ४) बंगळूरमध्ये कार्यक्रम संपवून येथून त्यांच्या मायदेशी रवाना होतील, असे ते म्हणाले.