नागूपर ते मुंबई सुस्साट, मोदींनी केली ओपनिंग तर फडणवीस ठरले फिनिशर; 4 थ्या टप्प्याचे लोकार्पण
Marathi June 06, 2025 07:25 AM

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi highway) अंतिम टप्प्याचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते 11 डिसेंबर 2022 रोजी समृद्धी नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील कामाचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर, महामार्गावरील प्रवासाला सुरुवात झाली. मात्र, पहिल्या टप्प्यातील हा प्रवास 520 किमीचाच होता. एकूण 701 किमीच्या या महामार्गातील उर्वरीत तीन टप्प्यांत काम प्रगतीपथावर असल्याने 181 किमीचे लोकार्पण बाकी होते. अखेर, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनाविस (देवेंद्र फडनाविस) यांच्याहस्ते समृद्धी महामार्गावरील 4 थ्या टप्प्याचे नाशिकमधील (nashik) इगतपुरीत ते आमणे या 76 किमीच्या महामार्गाचे लोकार्पण झाले. त्यामुळे, 4 टप्प्यांच्या लोकार्पणानंतर 701 किमी समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी खुला झाला आहे. यापूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्याहस्ते अनुक्रमे 2 आणि 3 टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले होते.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी-आमणे या 76 किमी लांबीच्या 4 थ्या आणि शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील अनेक मंत्री उपस्थित होते. समृद्धी महामार्गामुळे इगतपुरी ते कसाराचे अंतर अवघ्या 8 मिनिटात गाठता येणार असून 76 किमीच्या या टप्प्यात एकूण 5 बोगदे आहेत. त्यात, समृद्धी महामार्गावरील सर्वाधिक लांबीचा 8 किलोमीटरचा बोगदा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीपासून सुरू होतो.

701 किमी महामार्गाचे 4 टप्प्यात लोकार्पण

701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी दरम्यान 520 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण 11 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते, त्यानंतर तो वाहतूक सेवेचा भाग बनला. तर, 26 मे 2023 रोजी शिर्डी ते भरवीर दरम्यानच्या 80 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. 4 मार्च 2024 रोजी भरवीर ते इगतपुरी दरम्यानच्या 25 किलोमीटर टप्प्याचे उद्घाटन तत्कालीन सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. या सर्व टप्प्यांमुळे मार्च 2024 पासून नागपूर ते इगतपुरी या 625 किलोमीटरच्या प्रवासाला लक्षणीय गती मिळाली. मात्र, नागपूर ते मुंबई थेट 8 तासांत प्रवास केव्हा शक्य होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यासाठी इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर टप्प्याचा वाहतूक सेवेत समावेश होणे अत्यावश्यक होते. अखेर प्रवाशांची ही प्रतीक्षा संपली असून, गुरुवार 5 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी येथे या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण संपन्न झाले अन् फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाच्या 701 किमी वाहतूक सेवेला गती मिळाली.

समृद्धी महामार्गाची वैशिष्टे

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा 701 किमी मुंबई ते नागपूर जलदगती महामार्ग आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून या महामार्गाकडे पाहिले गेले. भारतातील सर्वात लांब महामार्ग असून महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना जोडणारा व 2.6 लाख किमी प्रवासाचे जाळे निर्माण करणारा हा महामार्ग आहे. या महामार्गालगत 3 आंतरराष्ट्रीय आणि 7 डोमेस्टीक विमानतळं आहेत. तसेच 2 मोठी आणि 48 लहान पोर्ट (बंदरे) आहेत. 6000 किमी रेल्वे नेटवर्कशी जोडणारा हा समृद्धी महामार्ग आहे. या महामार्गावरुन 120 किमी प्रतितास वेगाने प्रवास शक्य आहे. महामार्गालगत 11 लाख 50 हजार वृक्षांची लागवड करण्यात आलीय. देशातील पहिला संपूर्ण पर्यावरणपूरक हा महामार्ग ठरणार असल्याचे सांगितले जाते. पायाभूत सुविधा आणि दळणवळण गतीमान करण्याच्या उद्देशाने हा महामार्ग महाराष्ट्राला समृद्धीच्या वाटेवर नेणारा असल्याचे सरकारने म्हटलं आहे.

हेही वाचा

नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना तिकीट नाही; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितली निवडणुकीची तारीख

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.