सोलापूर: सोलापुरमध्ये सासरच्या छळाला आणि नवऱ्याच्या मारहाणीला कंटाळून एक गर्भवतीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं. दरम्यान या प्रकरणी तिच्या माहेरच्यांनी संशय व्यक्त केला आहे. आशाराणी भोसले असं मृत विवाहितेचं नाव आहे. याप्रकरणी आशाराणीच्या वडीलांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं की, सकाळी साडेसातच्या दरम्यान मुलीने व्हिडीओ कॉल केला. मृत आशाराणी तीन महिन्यांची गरोदर असल्याने हसत खेळत बोलली. मग चार-पाच तासात ती फाशी कशी घेईल? एवढ्या उंचीवर मुलगी फाशी कशी घेऊ शकते? मुलीची हत्याच आहे. मुलीकडे सारखी पैशाची मागणी करायचे, कार घेण्यासाठी पैसे पाठवा म्हणायचे, तुमच्या मुलीचा खून करतो, सोडणार नाही, अशी धमकी तिचा नवरा तिला वारंवार द्यायचा. त्याच्याकडे माणुसकीच नाही. माझ्या मुलीला ज्याप्रमाणे फाशी दिली, त्याप्रमाणे पवन याला फाशी दिली पाहिजे, अशा शब्दांत मृत आशाराणीचे वडील नागराज डोणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले.
मृत आशाराणी भोसलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रायचूर येथील आशाराणीचा विवाह तिच्या सख्ख्या बहिणीचा दीर पवन भोसले (रा. चिंचोली काटी, ता. मोहोळ) याच्यासोबत पाच वर्षांपूर्वी झाला होता. मात्र पैशांसाठी आणि पवनला चारचाकी गाडी, घर घेण्यासाठी पत्नी आशाराणीला माहेरून पैसे आण म्हणून मारहाण करू लागला. तर दुसरीकडे सासू अलका व सासरा बलभीम भोसले असे दोघे घरातील काम येत नाही म्हणून त्रास देऊ लागले. सततच्या त्रासाला कंटाळून आशाराणीने पोटात तीन महिन्यांचे बाळ आणि तीन वर्षांची गोंडस मुलगी असतानाही आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला.
प्रेमविवाहानंतर संसार सुरू झाला, मुलगी झाली… मात्र त्यानंतर छळ, मारहाण आणि तगादा यामुळे आशाराणी भोसले या विवाहितेने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आशाराणीने पती पवन भोसले याच्यासोबत पळून जाऊन लग्न केलं होतं. आता तिच्या मृत्यूनंतर तिची तीन वर्षांची चिमुरडी वैष्णवी सासरकडील ताब्यातून माहेरी सुपूर्त करण्यात आली आहे.
2019 मध्ये आशाराणीची मोठी बहीण उशाराणी हिचा विवाह मोहोळ तालुक्यातील चिंचोलीकाटी येथील ज्ञानेश्वर भोसले यांच्याशी झाला. त्यावेळी ज्ञानेश्वरचा धाकटा भाऊ पवन भोसले याच्याशी आशाराणीचे प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी पळून जाऊन लग्न केले.
लग्नानंतर दोन वर्षांनी आशाराणीला कन्यारत्न झालं. वैष्णवी असं तिच्या मुलीचं नाव. मात्र, मुलीनंतरच छळ सुरू झाला. सासरकडून चारचाकी गाडीची मागणी, आर्थिक खर्चासाठी पैसे या कारणांनी तिला मानसिक व शारीरिक त्रास दिला जाऊ लागला. पती पवन तिला व्हिडीओ कॉलवर मारहाण करत होता, असं आशाराणीच्या कुटुंबियांनी सांगितलं. 2024 साली ती माहेरी रायचूरला परतली. त्यानंतर दोन्ही कुटुंबांत समजूत घालून तिला पुन्हा नांदवण्यात आलं. मात्र, संसारात सुधारणा होण्याऐवजी त्रास अधिकच वाढला. अखेर 2025 मध्ये आशाराणीने आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर तिची मुलगी वैष्णवी ही सासरच्या ताब्यात होती. मात्र, स्थानिक पोलिस आणि नातेवाईकांच्या हस्तक्षेपामुळे ती आता आशाराणीच्या माहेरी देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, मृत आशाराणीची मोठी बहीण उशाराणी हिला देखील सासरी त्रास दिला जात असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे तीही मागील दोन महिन्यांपासून रायचूरला माहेरी राहत आहे. ही घटना फक्त एका महिलेची शोकांतिका नसून, प्रेमविवाहानंतरही महिलांना दिला जाणारा छळ, त्यावरील दुर्लक्ष आणि सामाजिक उदासीनतेचं भयावह उदाहरण आहे. संबंधित घटनेचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि महिला संघटनांनी केली आहे.
https://www.youtube.com/watch?v=y_atkhlshu
आणखी वाचा