Pakistan Terror Failure : दहशतवाद रोखण्यात पाक अपयशी : ओम बिर्ला
esakal June 06, 2025 01:45 PM

नवी दिल्ली : आपल्या भूमीतून सुरू असलेल्या दहशतवादी संघटनांच्या कारवाया रोखण्यात पाकिस्तान पूर्णपणे अपयशी ठरला असल्याचा हल्लाबोल लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी ब्रिक्स संसदीय मंचाच्या व्यासपीठावरून केला. तसेच, दहशतवाद्यांविरुद्ध भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत संयत परंतु निर्णायक कारवाई केल्याचेही लोकसभाध्यक्षांनी ठणकावून सांगितले.

ब्राझीलच्या ब्रासिलिया येथे ब्रिक्स संसदीय मंचाच्या व्यासपीठावरून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आंतरराष्ट्रीय समुहासमोर पाकिस्तानला लक्ष्य केले. ते म्हणाले, की पहलगाम हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला. ही घटना भारतालाच नव्हे, तर जगाच्या अंतःकरणाला हादरविणारी होती. भारताची दहशतवादविरोधी भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, भारत झीरो टॉलरन्स धोरणावर ठाम असून अशा कोणत्याही हल्ल्यांना कडक प्रत्युत्तर देण्यास कटिबद्ध आहे.

अशा हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत संयत, परंतु निर्णायक प्रत्युत्तर दिले. याचे उद्दिष्ट केवळ दहशतवादी संरचना नष्ट करणे व दहशतवाद्यांना निष्प्रभ करणे हेच होते. पाकिस्तान दहशतवादी यंत्रणेवर ठोस कारवाई करण्यात अपयशी ठरला आहे; भविष्यात अशा हल्ल्यांना रोखण्यासाठी आणि स्वतःच्या संरक्षणासाठी भारताने प्रत्युत्तरात्मक कारवाई करण्याच्या आपल्या हक्काचा उपयोग केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.