बांगलादेश एकेकाळी आपला मित्र होता. परंतू तेथील विद्यार्थी आंदोलनानंतर तत्कालिन पंतप्रधान शेख हसीना यांना पदच्युत केले. त्यानंतर शेख हसीना यांना भारताने आश्रय दिला. त्यामुळे आपणच निर्माण केलेला हा देश आपले उपकार विसरला…चीन आणि पाकच्या नादाला लागल्याचा संशय आहे. अशात आता तेथील अंतरिम सरकारचे प्रमुख जागतिक अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनुस यांनी त्यांचे राष्ट्रपिता शेख मुजीबुर्रहमान यांचा नोटांवरील फोटो हटवल्याचे वृत्त आहे. तसेच एका प्राचीन हिंदू मंदिराचा फोटो आपल्या नोटांवर छापून आपण हिंदू विरोधी नसल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे का असा सवाल केला जात आहे.
बांग्लादेशात विद्यार्थी क्रांती झाली आणि तेथील सत्तापलट झाला. या विद्यार्थी आंदोलनानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांची बांगलादेशातून हकालपट्टी झाली. त्यानंतर नदी खालून बरेच पाणी गेले आहे. तेथील कंटरपंथीयांनी हिंदूंच्या मंदिरांवर हल्ले केले. भारताविरोधात आघाडी सुरु केली. प. बंगालमध्ये वक्फ विरोधी आंदोलन भडकवण्यातही बांगलादेशातील काही कट्टरपंथी संघटनाचा हात असल्याचा भारतीय तपास यंत्रणांना संशय आहे. तेथील लष्कराने बसवलेले अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनुस तर जणू काही भारताचे कट्टर दुश्मनच बनल्यासारखे वागत आहेत.आता त्यांनी बांगलादेशचे चलन टका याच्यावरील राष्ट्रपिता शेख मुजीबुर्रहमान यांचाच फोटो काढून टाकला आहे.आणि आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी नोटांवर हिंदू मंदिराचेही फोटो छापले आहेत.
येथे पोस्ट पहा –
नोटांचे डिझाईन बदलताना बांग्लादेशाचे पहिले पंतप्रधान आणि राष्ट्रपिता मानले जाणाऱ्या शेख मुजीबुर रहमान यांचा फोटो हटवला आहे. त्याऐवजी बांगलादेशातील वारसास्थळांचे फोटो छापले आहेत. बांगलादेशातील शिखर बँकेने दिलेल्या माहितीनुसार नव्या चलनांवर आता हिंदू आणि बौद्ध मंदिरे, जुने ऐतिहासिक राजवाडे, ब्रिटीशकाळात दुष्काळ पडल्याचा संदर्भ असलेली जैनुल आबेदीन यांची छबी छापली आहे. एका नोटेवर तर नॅशनल मार्टियर्स मेमोरियलचाही फोटो छापला आहे.
बांग्लादेशाच्या 20 टका चलनावर एका प्राचीन हिंदू मंदिराचा फोटो छापण्यात आला आहे. त्याचे नाव कांता जू मंदिर आहे.त्याला कांतानगर मंदिर वा कांताजी मंदिर देखील म्हटले जाते. बांग्लादेशाच्या दिनाजपुर जिल्ह्यातील हे मंदिर आहे. हे मंदिर 18व्या शतकातले आहे. हे मंदिर त्याच्या सुंदर टेराकोटा वास्तुकलेसाठी ओळखले जाते. त्यात अत्यंत कोरीव नक्षीकाम केलेले आहे. त्यात हिंदू पौराणिक कथेतील दृश्ये चित्रित केलेली आहेत. असे म्हटले जाते की 1704 मध्ये दिनाजपुरचे राजा प्राणनाथ यांनी या मंदिराचे पायाभरणी केली होती. आणि 48 वर्षांनंतर साल 1752 मध्ये हे 9 मजल्याचे अतिशय सुंदर मंदिर अखेर बांधून पूर्ण झाले. त्यावेळी राजा प्राणनाथ यांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांचे पूत्र राजा रामनाथ या मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. साल 1897 मध्ये जेव्हा येथे भूकंप झाला तेव्हा या मंदिराचे अनेक मजले तुटले..
भारताच्या फाळणीनंतर आणि नंतर 1971 च्या बांगलादेश स्वांतत्र्य लढ्यादरम्यान, या कांताजी मंदिराकडे दुर्लक्ष झाले तर कट्टर पंथीयांनी त्याच्यावर हल्लाही केला होता. येथे दरवर्षी भरणाऱ्या रास मेळा उत्सवाला हजारो पर्यटक येतात. 5 डिसेंबर 2015 रोजी, अशाच रास मेळा उत्सवादरम्यान, मंदिराच्या परिसरात तीन क्रुड बॉम्बचे स्फोट झाले. त्यात दहा जण जखमी झाले होते. या हल्ल्यासाठी न्यू जमातुल मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) जबाबदार असल्याचे म्हटले जात होते. परंतू या संघटनेने जबाबदारी घेतली नाही.
मार्च 2024 मध्ये,या ( कांताजी ) कांताज्युव मंदिराच्या संबंधित जमीनीवर मशिदीचे बांधकाम सुरू करण्यात आले. दिनाजपूर-१ मतदारसंघाचे खासदार मोहम्मद झकारिया झका यांनी या मशीदीच्या बांधकामाचे उद्घाटन केले होते.त्यामुळे स्थानिक हिंदू समुदायात तणाव निर्माण झाला होता.