अतिसाराचे बाधित वाढले
esakal June 06, 2025 09:45 PM

पिंपरी, ता. ६ : शाळा सुरू होण्याच्या तोंडावरच शहरात अतिसाराचे बाधित वाढले आहेत. प्रामुख्याने पोटदुखी, उलटी, जुलाब यासारख्या आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. पाणी उकळून, गाळून घेऊनच प्यावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

दरवर्षी जूनमध्ये येणाऱ्या मॉन्सूनने या वर्षी लवकरच हजेरी लावली. मे महिन्यातील याच काळात अनेक लग्न समारंभ पार पडले. तसेच सुट्ट्यांचा काळ असल्याने बाहेरील पदार्थ खाण्याचे प्रमाणही वाढलेले होते. यंदा लवकर आलेल्या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी पाणी साचले. तसेच अनेक ठिकाणी ड्रेनेज तुंबले. अशा वेळी पिण्याच्या पाण्यात दूषित पाणी मिसळल्याने त्यामुळे अन्नपदार्थ दूषित होण्याची शक्यता वाढते. या कारणांमुळे अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

सध्या बदलेल्या राहणीमानामुळे बाहेरचे अन्नपदार्थ खाण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. अनेकदा घरबसल्या अन्न ‘ऑर्डर’ केले जाते. अशा वेळी ते कोणत्या परिस्थितीत बनवले जाते हे पाहिले जात नाही. पावसाळ्यात हे अन्नपदार्थ दूषित होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे त्यामधून संसर्ग होण्याचीही शक्यता बळावते. सध्या आढळून आलेल्या अतिसाराच्या बहुतांश रुग्णांना अन्नातूनच संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

मुलांची ही घ्या काळजी
उन्हाळी सुट्टीनंतर आता शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे मोठ्या कालावधीनंतर मुले घराबाहेर पडतात. मात्र, सध्याची वातावरणाची स्थिती पाहता मुलांना शाळेत पाठवताना त्यांची योग्य काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञ करत आहेत.

ही घ्या काळजी
- पाणी उकळून थंड करून प्या
- जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवा
- बाहेरचे अन्न खाणे टाळा
- घरातील ताजे व गरम अन्नाचे सेवन करा
- अन्नपदार्थ झाकून ठेवा

सध्या अतिसार, उलट्या, जुलाब यांचे रुग्ण वाढले आहेत. सर्वच वयोगटांमध्ये ही समस्या दिसून येत आहेत. लहान मुलांमध्ये हे प्रमाण फारसे नसले, तरी सतत प्रवास करणाऱ्या व बाहेरचे खाणाऱ्या नागरिकांमध्ये हे आजार आढळून येत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अन्न सेवन करताना विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
- श्रीकांत कुऱ्हाडे, वैद्यकीय तज्ज्ञ

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.