दौंड, ता. ५ : दौंड शहरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत अडीचशे किलो गोमांस जप्त करून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राज्य शासनाने गायीला राज्यमाता- गोमातेचा दर्जा देऊन नऊ महिने झाल्यानंतरही दौंड शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर गायींची कत्तल राजरोसपणे सुरू असल्याचे या कारवाईच्या निमित्ताने पुन्हा प्रकर्षाने पुढे आले आहे.
याबाबत दौंड पोलिस ठाण्याचे हवालदार अमीर जिलानी यांनी माहिती दिली की, दौंड शहरातील भीमा नदीकाठावर असलेल्या खाटीक गल्ली येथे मैदानाजवळ बुधवारी (ता. ४) ही कारवाई केली. तेथे अनिस मुश्ताक शेख व नितीन उचाप्पा गायकवाड (दोघेही रा. खाटीक गल्ली, दौंड) हे गोहत्या करताना पोलिसांना आढळून आले. चौकशीत आसिफ कासम कुरेशी (रा. खाटीक गल्ली, दौंड) याच्या सांगण्यावरून अनिस शेख व नितीन गायकवाड हे गायींची कत्तल करून गोमांस गोळा करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या प्रकरणी पोलिस अंमलदार करमचंद बंडगर यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेल्या गोमांसाचे पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नमुने घेत राहिलेले गोमांस दौंड पोलिसांच्या उपस्थितीत नष्ट केले. या कारवाईत जप्त केलेल्या एकूण २५० किलो गोमांसाचे एकूण मूल्य ४० हजार रुपये इतके असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.