Raj Thackeray and Uddhav Thackeray alliance sandeep deshpande avinash jadhav press
Marathi June 07, 2025 01:25 AM


मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत अनेक विधाने केली. पत्रकारांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी सांगितले की, एकदा दुधाने तोंड पोळले की त्यामुळे आम्ही ताकही फुंकून पितो. असे म्हणत सूचक विधान केले. तर, मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की, युतीसाठी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना एक कॉल करावा, उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे यावे असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली. (Raj Thackeray and Uddhav Thackeray alliance sandeep deshpande avinash jadhav)

हेही वाचा : Uddhav Thackeray : संदेश नाही तर बातमीच देईन, मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचे सूचक विधान 

मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, “शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीसंदर्भातील निर्णय राज ठाकरे घेत असतात. यासंदर्भात कोणतीही चर्चा पक्षांतर्गत झाली नाही. आमचे तोंड दुधाने पोळले गेले आहे. त्यामुळे आम्ही ताकही फुंकून पितो. जोपर्यंत कोणताही ठोस प्रस्ताव राज ठाकरेंपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत आम्ही निर्णय घेणार नाही.” असे त्यांनी स्पष्ट केले. “2014 आणि 2017 मध्ये युती करावी ही आमची अपेक्षा होती. त्यावेळी युती करावी असा निरोप घेऊन बाळा नांदगावकर गेले होते. तो प्रस्ताव होता. तसा कोणताही प्रस्ताव आता आला नाही. तसा प्रस्ताव आला तर राज ठाकरे त्यावर निर्णय घेतील,” असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की दोन्ही भावांकडे एकमेकांचा नंबर आहे. सगळी शिवसेना म्हणत असेल की, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबरोबर जायला हवे. तर उद्धव ठाकरेंकडून एक फोन यावा अशी अपेक्षा आहे. कॅमेऱ्यासमोर बोलणाऱ्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंशी बोलावे. एक पाऊल पुढे या, राज ठाकरे 100 पावले पुढे येतील. जोपर्यंत त्यांच्याकडून काहीही ठोस येत नाही, तोवर आम्ही पुढे कसे जाणार?” असे ते म्हणाले. त्यामुळे आता उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवतीर्थ आणि कॅफे

शिवतीर्थ हे कॅफे नाही, तर माझ्यासाठी दुसरे घर आहे, असे संजय राऊत म्हणाले, त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की “नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहिल्यानंतर संजय राऊत यांच्या विचारात जे परिवर्तन झाले आहे, त्याचे स्वागत करतो. परिवर्तनही संसार का नियम, असे गीता वगैरे वाचून पटले असेल,” असा टोला त्यांनी लगावला. “कॅफे संस्कृती हा त्यांचा शब्द असला, तरी जगभरातील क्रिकेटपटू, कलाकार किंवा नेते बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून मातोश्रीवर येत आलेत, तीच परंपरा राज ठाकरे यांनी पुढे घेऊन जात आहेत.” असेही ते पुढे म्हणाले.



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.