पुणे : "आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (एआय) सध्या संशोधन, कला, मनोरंजनापासून ते उद्योग, व्यवसायामध्ये सर्रासपणे वापर होऊ लागला आहे. त्याद्वारे अनेक प्रश्न सहजपणे सोडविणे शक्य झाले आहे. "एआय' तंत्रज्ञान अनेक क्षेत्रात पुढे येत असले तरी नावीन्य व सर्जनशीलतेच्या क्षेत्रात मानवी बुद्धिमत्तेशिवाय पर्याय असणार नाही.' असे "एआय' तज्ज्ञ अजित जगताप यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) अधिवेशनात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' या विषयावर जगताप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. एआय तंत्रज्ञानामुळे होणारे बदल, त्याचा समाजाला होणारा फायदा, त्याचे दुष्परिणाम व एआयची भविष्यातील वाटचाल यासंदर्भात जगताप यांनी संवाद साधला.
जगताप म्हणाले, "जुन्या व नवनिर्मिती नसणाऱ्या कामांसाठी एआयचा वापर मोठ्या प्रमाणात करता येतो. उद्योग, व्यवसायामध्ये त्याचा चांगला उपयोग करता येऊ शकतो. मात्र नाविन्य, सर्जनशीलतेवर त्यास काम करण्यास मर्यादा येतात. एआय आता वैद्यकीय सेवेपासून ते कोडींगपर्यंत त्या-त्या विषयात तज्ज्ञ होत चालला आहे. २० लोकांचे काम एआयमुळे सोपे व कमी वेळेत होऊ लागले आहे. एखाद्या प्रकल्पावर देखरेख ठेवण्यापासून ते प्रकल्प व्यवस्थापनाचेही काम ते करू लागले आहे.' विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची जगताप यांनी उत्तरे दिली.
जगताप म्हणाले,
- एआयचा सायबर सुरक्षेसाठी महत्वाचा, पण तितक्याच अडचणीही आणतो
- एआयमुळे नोकऱ्यांवर मर्यादा आल्या तरी, नाविन्य, वेगळेपणा देणाऱ्यांना मोठ्या संधी
- कृत्रीम बुद्धिमत्ता व यंत्राच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज
- तरुणांनी एआय तं त्रज्ञान आत्मसात करण्याची आवश्यकता
- नावीन्य व सर्जनशीलतेमध्ये संधी शोधण्यास प्राधान्य द्यावे.'