इंग्लंड दौऱ्यात टीम इंडिया एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्याआधी इंडिया ए विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यात 2 अनऑफिशियल टेस्ट मॅचची सीरिज खेळवण्यात येत आहे. उभयसंघातील पहिला सामना हा अनिर्णित राहिला. तर दुसऱ्या सामन्याला 6 जूनपासून सुरुवात झाली. सामन्यातील पहिल्याच दिवशी इंडिया ए टीमचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल याने केलेल्या कृतीची सोशल मीडियावर एकच चर्चा पाहायला मिळत आहे. यशस्वीला अंपायरने आऊट दिलं. त्यामुळे यशस्वीने या निर्णयाविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली. नक्की काय झालं? सविस्तर जाणून घेऊयात.
यशस्वी जयस्वाल अंपायरसोबत भिडला. यशस्वी 17 धावांवर खेळत होता. तेव्हा ख्रिस वोक्सने यशस्वीला एलबीडब्ल्यू आऊट केलं. मात्र यशस्वीला अंपायरने दिलेला निर्णय पटला नाही. यशस्वीने अंपायरकडे बॉल बाहेर जात होता असं इशारा करत एलबीडब्ल्यू निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली. यशस्वी जागेवरच उभा राहिला आणि अंपायरकडे रोखून पाहू लागला. मात्र काही सेंकदानंतर यशस्वीने मैदानाबाहेरचा रस्ता धरला. यशस्वीचा हा व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
ख्रिस वोक्स इंडिया ए टीमच्या डावातील सातवी ओव्हर टाकत होता. वोक्सने या दरम्यान एक बॉल यशस्वीच्या लेग स्टंपवर टाकला. यशस्वी हा बॉल निट खेळण्यात अपयशी ठरला. वोक्सने टाकलेला बॉल यशस्वीच्या बॅटला स्पर्श न करता पॅड लागला. त्यामुळे जोरदार अपील करण्यात आली. अंपायरनेही आऊट दिलं. मात्र यशस्वीला निर्णय योग्य वाटला नाही. आपण नॉट आऊटच आहोत, यावर यशस्वी ठाम होता. यशस्वी अंपायरच्या निर्णयानंतरही मैदानात उभा राहिला. य़शस्वी अंपायरकडे रागाने पाहत होता. मात्र यशस्वीसमोर नाराजी व्यक्त करण्याशिवाय पर्यायही नव्हता. त्यामुळे यशस्वीने काही सेकंद नाराजी जाहीर केली आणि मग मैदानाबाहेर गेला.
यशस्वी जयस्वालची भर मैदानात नाराज, पाहा व्हीडिओ
दरम्यान इंडिया एने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 83 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 319 रन्स केल्या. तनुष कोटीयन 5 तर अंशुल कंबोज 1 रनवर नॉट आऊट परतले. तर केएल राहुल याने सर्वाधिक 116 रन्स केल्या. तसेच ध्रुव जुरेल 52, करुण नायर 40, नितीश कुमार रेड्डी 34, शार्दूल ठाकुर 19, यशस्वी जैस्वाल 17, कर्णधार अभिमन्यू इश्वरन याने 11 धावांचं योगदान दिलं. आता इंडिया ए दुसऱ्या दिवशी किती धावा करणार? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, अभिमन्यु ईश्वरन (कर्णधार), करुण नायर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नीतीश कुमार रेड्डी, शार्दूल ठाकुर, तनुष कोटीयन, अंशुल कंबोज, तुषार देशपांडे आणि खलील अहमद.