मुंबई : राज्याच्या राजकारणात दोन्ही ठाकरे बंधूंनी म्हणजेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे, अशी मागणी पदाधिकाऱ्यांसोबतच जनसामान्यांकडून करण्यात येत आहे. या दोन्ही पक्षातील नेते याबाबत विविध मत व्यक्त करत असतानाच आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत सूचक विधान केले आहे. मनसेसोबतच्या युतीबाबत मी संदेश नाही तर थेट बातमीच देईन, असे ठाकरेंनी म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये याबाबत चर्चा तर सुरू झाली नाही ना किंवा हा निर्णय लवकरच तर जाहीर होणार नाही, असे एक ना अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरेंनी या युतीबाबत सकारात्मक उत्तर दिल्याने महापालिका निवडणुकीत युती नक्की हे जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे. (Uddhav Thackeray suggestive statement on alliance with MNS)
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज शुक्रवारी (ता. 6 जून) पत्रकार परिषद पार पडली. जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या सेनेत गेलेल्या सुजाता शिंगाडे यांच्या घरवापसीसाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पण याचवेळी प्रसार माध्यमांनी ठाकरेंना मनसेसोबतच्या युतीबाबत विचारणा केली. राज ठाकरे – उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार? असा प्रश्न यावेळी ठाकरेंना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले की, “जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे, ते होईल.” असे एका वाक्यात सकारात्मक उत्तर ठाकरेंनी दिले. तसेच, याबाबत जे बाकीचे बारकावे आहे, ते आम्ही पाहात आहोत. त्यामुळे संदेश कशाला तर मी बातमीच देईन तुम्हाला, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केले आहे.
तर, माझ्या शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे कोणते नेते आमच्या एकमेकांच्या संपर्कात आहेत, त्यांच्याही मनात संभ्रम नाही. त्यामुळे आम्ही कोणताही संदेश देण्यापेक्षा आम्हाला जी काही बातमी द्यायची आहे, ती आम्ही देऊ, असे ठाकरेंकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी एक कॉल करावा, राज ठाकरे शंभर पावले पुढे येतील असे म्हणत एक प्रकारे युतीसाठी बोलणी करण्यासाठी आवाहन केले. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र येणार की नाही, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले आहे.