पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते कार्यक्रम, जम्मू-काश्मीर वाहतूक आता कोणत्याही ऋतूत शक्य
मंडळ / श्रीनगर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच असणाऱ्या ‘चिनाब सेतू’चे कटरा येथे उद्घाटन केले आहे. या सेतूमुळे कोणत्याही ऋतूमध्ये जम्मू आणि काश्मीर या दोन प्रदेशांमध्ये रेल्वे वाहतूक करणे शक्य होईल. हा सेतू सामरिक दृष्टीनेही महत्वाचा असून त्यामुळे सैन्य आणि युद्धसामग्रीचीही वाहतूक केव्हाही करणे सुलभ होईल. तो भारताचा अभियांत्रिकी ‘चमत्कार’ मानण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सेतूचे रितसर उद्घाटन केल्यानंतर या सेतूवरून धावणाऱ्या ‘वंदे भारत’ वेगवान रेल्वेगाडीलाही हरित ध्वज दाखवून तिचे उद्घाटन केले. या प्रसंगी केलेल्या भाषणात त्यांनी या सेतूचे महत्व स्पष्ट केले. या सेतूमुळे जम्मू आणि काश्मीर हे दोन भाग एकमेकांशी जोडले गेले आहेत. हा सेतू कोणत्याही हवामानात किंवा ऋतूत कार्यरत राहणार असल्याने हिंवाळ्यातील हिममय वातावरणातही या दोन्ही भागांमध्ये वाहतून शक्य होणार आहे.
निरीक्षण आणि माहिती
या सेतूचे उद्घाटन करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या त्याचे निरीक्षण केले आणि त्याचे निर्माण कार्य करणाऱ्या तंत्रज्ञांकडून या सेतूची माहिती घेतली. हा सेतू म्हणजे भारताच्या वेगाने होणाऱ्या विकासाचे प्रतीक आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. उद्घाटनापूर्वी त्यांनी या सेतूवर भारताचा राष्ट्रध्वज हाती धरुन पदयात्राही केली. त्यांच्यासमवेत अनेक मान्यवरांनीही सेतूवर पदयात्रा केली.
पाकिस्तान शांती आणि रोटीचा शत्रू
पाकिस्तान हा देश शांतता आणि लोकांची रोटी या दोन्हींचा शत्रू आहे. आम्ही पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली आहे. पाकिस्तान भारतात दंगे घडविण्याचा प्रयत्न करत असून त्याला भारताची प्रगती सहन होत नाही. त्यामुळे भारतात दहशतवादी हल्ले करुन भारताचा आत्मविश्वास डळमळीत करण्याचे त्याचे कारस्थान आहे. भारतीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाव्यात आणि भारतात अशांतता पसरावी, हा पहलगाम हल्ल्याचा मुख्य हेतू होता. पण भारतीय सेनादलांनी अतुलनीय पराक्रम गाजवून पाकिस्तानचा हा हेतू अक्षरश: चिरडून टाकला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
?
रोजगाराचा गळा घोटण्यासाठी…
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटन व्यवसाय वाढीला लागला आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला असून त्यांच्या समृद्धीत भर पडली आहे. त्यामुळे स्थानिक लोक अशांततेचा मार्ग सोडून रोजगारचा मार्ग स्वीकारला. यामुळे पाकिस्तानचा जळफळाट होत असून त्याने जम्मू-काश्मीरच्या शांततेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मीरच्या जनतेला वेळीस धरण्याचे क्रौर्य दाखविले आहे. पण भारताने त्याची नांगी मोडून आपल्या सामर्थ्याचा परिचय घडविला आहे, अशी प्रशंसाही त्यांनी केली आहे.
इन्सानियत आणि काश्मीरियत
पहलगाम हल्ला हा नुसता दहशतवादी हल्ला नाही. तो इन्सानियत, अर्थात मानवतावाद आणि काश्मीरियत, अर्थात काश्मीरची अस्मिता यांच्यावरील घाला होता. आम्हाला या हल्ल्याला अत्यंत प्रखर उत्तर द्यावे लागले. आमच्या ‘सिंदूर’ अभियानात पाकिस्तानचे अनेक दहशतवादी तळ आणि वायुतळ उध्वस्त करुन पाकिस्ताची प्रचंड हानी केली आहे. कोणत्याही प्रकारचा दहशतवाद आम्ही कधीही सहन करणार नाही, हे आम्ही जगाला दर्शविले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. 22 एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यानंतर आणि त्यानंतर भारताने यशस्वी केलेल्या ‘सिंदूर’ अभियानानंतची ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रथमच जम्मू-काश्मीर भेट आहे. या भेटीच्या वेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था राखण्यात आली होती.
कार्यक्रमाला प्रचंड गर्दी
चिनाब सेतूचे उद्घाटन आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण या कार्यक्रमांसाठी स्थानिक जनतेने प्रचंड गर्दी केली. इतकी मोठी सभा यापूर्वीच्या कित्येक वर्षांमध्ये काश्मीर खोऱ्यात झाली नव्हती, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ओजस्वी भाषण करुन, कोणत्याही परिस्थितीत जम्मू-काश्मीरच्या विकासाकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, हे स्पष्ट केले.
मलाही पदोन्नती द्या!
या सर्व कार्यक्रमाला जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला उपस्थित होते. आता केंद्र सरकारने या प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. केंद्र सरकारने या प्रदेशाच्या उपराज्यपालांना अधिकार देऊन त्यांची पदोन्नती केली. आता या प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांचीही पदोन्नती करा, अशी मागणी त्यांनी भाषणात केली.
असा आहे चिनाब सेतू…
ड कोणत्याही ऋतूत सेतू राहणार कार्यरत, त्यामुळे सातत्याने वाहतूक होणार
ड शत्रूच्या हल्ल्यातही सेतू राहणार सुरक्षित, भक्कम रचनेमुळे सुरक्षेची निश्चिती
ड जम्मू-काश्मीरच्या जनतेच्या 70 वर्षांपूर्वीपासूनच्या स्वप्नांची यामुळे पूर्ती
ड हा सेतू उधमपूर-बारामुल्ला-श्रीनगर रेल्वे महाप्रकल्पाचा एक महत्वाचा भाग
ड या सेतूमुळे काश्मीर ते कन्याकुमारी असा संपूर्ण भारत जोडला जाणार
ड या संपूर्ण रेल्वे प्रकल्पासाठी खर्च होणार आहेत, एकंदर 43 हजार कोटी