Ban on RCB for Bengaluru Stampede : आयपीएल 2025 च्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा संघ चांगलाच वादात सापडला आहे. बंगळुरू येथे या विजयी संघाचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमावेळी बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आता या प्रकरणाची पौलीस चौकशी करत आहेत. असे असतानाच आता आरसीबी या संघाची डोकेदुखी कमी होताना दिसत नाहीये. चॅम्पियन ठरलेल्या या संघावर थेट बंदीचं संकट येऊ शकतं.
बंगळुरूच्या चीन्नास्वामी या स्टेडियमवर विजेत्या बंगळुरू संघाच्या खेळाडूंचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला स्टार क्रिकेटर विराट कोहली याच्यासह बंगळुरूचे सर्वच खेळाडू होते. मात्र बंगळुरूचा संघ येणार म्हटल्यावर येथे लाखो चाहते मोठ्या संख्येने जमा झाले होते. स्टेडियमबाहेर मोठी गर्दी झाली होती. परिणामी इथे मोठी चेंगराचेंगरी झाली. यात तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला. तर 30 पेक्षा अधिक लोक जखमी झाले.
या दुर्दैवी घटनेचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले. परिणामी बंगळुरू संघ तसेच सत्कार समारंभ आयोजित करणाऱ्यावर सडकून टीका करण्यात आली. बंगळुरू संघाविषयी तर अनेकांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणी बंगळुरूत एका पोलीस अधिकाऱ्यालाा निलंबित करण्यात आलं आहे. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे राजकीय सचिव के. गोविंदराजू यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. दुसरीकडे आरसीबी संघाचा जाहिरात विभागाचा प्रमुख निखील सोसले यालाही पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता आरसीबीसमोर मोठं संकट उभं टाकलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरू संघाचा स्टार प्लेयर विराट कोहली याच्याविरोधातही पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच या ज्या पद्धतीन चेन्नई सुपरकिंग्ज तसेच राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांवर बंदी घालण्यात आली होती, अगदी त्याच पद्धतीने बंगळुरू संघावरही दोन वर्षांसाठी बंदी घालावी, अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, बंगळुरू संघावर बंदी घालण्याची मागणी केली जात असताना हे प्रत्यक्षात घडू शकतं का असं विचारलं जात आहे. मात्र अद्यापतरी विजयी मिरवणूक काढावी अशी कोणतीही मागणी बंगळुरू संघातील खेळाडूंनी केल्याचे समोर आलेले नाही. असे असले तरी इशारा देऊनही बंगळुरू संघाने निष्काळजीपणा केल्याचा दावा केला जाऊ शकतो. बंगळुरूत झालेली चेंगराचेंगरी म्हणजे आरसीबी संघाचे व्यवस्थापन पाहणाऱ्यांचे तसेच कर्नाटक सरकारचे हे एका प्रकारचे अपयशच आहे, असे म्हटले जात आहे. बंगळुरू संघाविरोधात जाणारे काही पुरावेही सापडले आहेत, असं बोललं जातंय. त्यामुळे सध्याच्या वाढत्या दबावामुळे भविष्यात कदाचीत बंगळुरू संघावर आगामी हंगामात खेळण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असं बोललं जातंय. दरम्यान, बंदीसंदर्भात अद्यापतरी कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. तसे कोणतेही वृत्त नाही. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.