बार्शीटाकळी : शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बोरमळी येथील धरणात चिखलगाव येथील दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ता. ७ जून रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार पातूर तालुक्यातील चिखलगाव येथील चार युवक रुद्रायणी गडावर दर्शनाकरिता आले होते. घराकडे परत जात असताना, त्यापैकी दोन मित्र शौचास गेले. आणि योगेश आश्रुबा डहाळे (वय १८), कार्तिक किसना डहाळे (वय १७, रा. शिर्ला) हे दोघे बोरमळी धरणातील पाण्यात पोहण्याकरिता उतरले. मात्र, त्यांना पाण्याची खोलाईचा अंदाज आला नसल्याने, त्यांचा पाण्यात बुडून दुदैवी अंत झाला. घटनेची माहिती धरणाच्या दुसऱ्या काठावरील ग्रामस्थांना मिळताच त्यांनी पाण्यात बुडालेल्या दोघातील एका युवकास बाहेर काढले.
पुनोती येथील रहिवासी राजू पाटील काकड यांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पथकाने घटनास्थळी धाव घेत तहसीलदार राजेश वझीरे यांच्या आदेशावरून धरणात सर्च ऑपरेशन राबविले.
यामध्ये दुसऱ्या युवकाला बाहेर काढण्यात पथकाला यश आले. बार्शीटाकळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविले. पथकप्रमुख दीपक सदाफळे, मयुर सळेदार, शेखर केवट, अंकुश सदाफळे, विष्णू केवट, किशोर तायडे, शिवम वानखडे, सार्थक वानखडे सर्च ऑपरेशन राबविले.