PM Narendra Modi : मानवता अन् काश्मिरीयतवर पाकचा हल्ला,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघात; चिनाब नदीवरील रेल्वे पुलाचे लोकार्पण
esakal June 07, 2025 12:45 PM

कटरा : ‘‘पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर भ्याड हल्ला करत एकप्रकारे मानवता आणि काश्मीरियतवर घाला घातला,’’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. या हल्ल्याच्या माध्यमातून देशात धार्मिक दंगली घडविण्याचा आणि पर्यटनावर अवलंबून असलेल्या लोकांंची उपजिविका हिरावून घेण्याचा पाकिस्तानचा डाव होता, असेही ते म्हणाले.

कटरा येथून काश्मीर खोऱ्यासाठी पहिली रेल्वे रवाना केल्यानंतर तसाच चिनाब नदीवरील रेल्वे पुलाचे लोकार्पण यासह विविध विकास कामांचे उद््घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदी सभेत बोलत होते. यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती. ऑपरेशन सिंदूरनंतर मोदी पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये आले होते.

ते म्हणाले, पर्यटन रोजगार देण्याचे काम करतो आणि लोकांना एकमेकांशी जोडण्याचीही भूमिका बजावतो. मात्र दुर्दैवाने शेजारचा देश हा मानवता, सलोखा आणि पर्यटनाचा शत्रू आहे. एवढेच नाही तर पाकिस्तान सर्वसामान्य लोकांच्या पोटावर पाय देण्याचेही काम करतो. पहलगामचा २२ एप्रिल रोजीचा हल्ला हा पाकिस्तानची दुष्प्रवृत्ती दाखविणारा होता.

पाकिस्तानने पहलगाममध्ये मानवतेवर आणि काश्मिरीयतवर हल्ला केला. त्यांना भारतात धार्मिक दंगली घडवून आणायच्या होत्या. पण भारतीयांनी ऐक्याचे दर्शन घडवून पाकिस्तानचे मनसुबे अपयशी ठरविले. काश्मीरमधील तरुण दहशतवादाचा मुकाबला करण्यास सज्ज झाले आहेत. याच दहशतवाद्यांनी मागे शाळा जाळल्या, रुग्णालयांची मोडतोड केली, अनेक पिढ्यांचे भवितव्य अंधारात लोटले.

आता पाकिस्तानच्या कारस्थानाविरोधात काश्मीरची जनता उभी राहिली आहे. जनतेने दाखविलेली शक्ती ही केवळ पाकिस्तानच नाही तर जगभरातील दहशतवाद्यांना इशारा देणारी आहे. आज सहा जून आहे आणि बरोबर महिन्यापूर्वीच भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या केंद्रावर हल्ले केले. आता नुसते ऑपरेशन सिंदूरचे नाव ऐकले तरी पाकिस्तानला मिळालेला धडा आठवेल.

पंतप्रधान म्हणाले, आज सामर्थ्यशाली भारताचा जयघोष होत आहे. जम्मू काश्मीरला आज दोन नवीन वंदे भारत रेल्वे मिळाल्या असून जम्मूत एका नव्या वैद्यकीय महाविद्यालयाचे देखील भूमिपूजन झाले आहे. या एकूण ४६ हजार कोटी रुपयांच्या योजना असून त्या राज्याच्या विकासाला नवीन गती देतील. जम्मू काश्मीरच्या अनेक पिढ्यांनी रेल्वेजाळ्याचे स्वप्न पाहिले. मी काल उमर अब्दुल्ला यांचे मत ऐकले. ते आठवीत शिकत असताना रेल्वे प्रकल्पाचे स्वप्न पाहत होते. आज जम्मू काश्मीरच्या लाखो लोकांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

राज्याचा दर्जा द्या: उमर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वंदे भारतचे लोकार्पण झाल्यानंतर मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, ‘‘व्यासपीठावर असणारे चौघे कटरा रेल्वे स्थानकाच्या उद््घाटनप्रसंगी (२०१४) होते. तुम्ही नुकतीच निवडणूक जिंकली होती. आपण पहिल्यांदा पंतप्रधान झाला होता. त्यावेळी पंतप्रधान कार्यालयात जितेंद्र सिंह होते आणि आमचे नायब राज्यपाल मनोज सिंन्हा हे रेल्वे राज्यमंत्री म्हणून कर्तव्य बजावत होते आणि मी देखील मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होतो.

माता वैष्णोदेवीच्या कृपेने मनोज सिन्हा यांना बढती मिळाली, परंतु माझी पदावनती झाली. मी एक राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि आता केंद्रशासित प्रदेशाचा मुख्यमंत्री आहे. अर्थात परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी फार वेळ लागणार नाही, असे वाटते. जम्मू काश्मीरला तुमच्याच देखरेखीखाली राज्याचा दर्जा मिळेल, असा मला विश्वास आहे. काश्मीरमध्ये रेल्वे धावण्याचे अनेकांनी स्वप्न पाहिले. एवढेच नाही तर इंग्रजांनी देखील काश्मीरला रेल्वेने जोडण्याचे स्वप्न पाहिले, परंतु ते यशस्वी ठरले नाहीत. पण जे काम इंग्रज करू शकले नाही ते तुमच्या (मोदी) हाताने झाले आणि काश्मीर देशाच्या अन्य भागांशी जोडला गेला.

जेवढे चांगले प्रकल्प असतात, ते सगळेच माझ्यासाठीच राहतात, हे मात्र खरे. आमचे भाग्य आहे की या प्रकल्पाला आमच्या कार्यकाळात वेग मिळाला आणि आम्ही तो पूर्ण करून दाखवला. या योजना विकासाचा वेग, दृढनिश्चय आणि ऐक्य याचा संगम आहे.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.