Free Surgery and Treatment for Underprivileged Patients: राज्य सरकारतर्फे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य विमा आणि केंद्र सरकारतर्फे पंतप्रधान जनआरोग्य अर्थात आयुष्यमान भारत योजनेचे गरिबांना आरोग्य विम्याचे सुरक्षा कवच दिले आहे. मात्र या दोन्ही योजनांचा लाभ ज्यांना मिळू शकत नाही, अशा गरीब, बीपीएल रुग्णांसाठी राष्ट्रीय आरोग्य निधीतून उपचार होऊ शकतात.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने या तिसऱ्या योजनेतूनही गरीब रुग्णांना आरोग्य विम्याचा लाभ देण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. यातून गरिबांना आरोग्याचे सुरक्षेचे कवच देणारे हे दुसरे रुग्णालय झाले आहे.
उपराजधानीत ही योजना अनेक रुग्णालयांना माहिती नाही. यामुळेच शहरात केवळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विभागीय कर्करोग धर्मदाय रुग्णालयाने नोंदणी केली. या योजनेतून रुग्णांना आरोग्य विम्याचा लाभ मिळतो. मोफत उपचार होतात. यानंतर आता मेयो रुग्णालयाने नोंदणीसाठी अर्ज केला आहे. अत्यंत दुर्मीळ आजारासाठी या योजनेतून उपचार केले जातात.
मेयोने केंद्र सरकारकडे प्रक्रिया सुरू केली आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच मेयोत या योजनेतून रुग्णांवर उपचार सुलभ होणार आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे नोडल अधिकारी आणि मेयोच्या अस्थिरोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. विकास आत्राम यांच्यावरच नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविली जाणार आहे.
१५ लाख रुपयांपर्यंत मिळते मदतज्यांचे वार्षिक उत्पन्न २० हजारांच्या घरात आहे. ज्यांच्याकडे कोणत्याही स्वरूपाच्या रेशन कार्ड नाही. अशांनाही जवळ जवळ १५ लाखांपर्यंतचे आरोग्य सुरक्षा कवच या योजनेतून मिळते. जे रुग्ण महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य विमा योजना अथवा आयुष्यमान भारत आरोग्य विमा योजनेच्या कक्षेत बसत नाहीत, अशांना दुर्मिळ आजारासाठी या योजनेतून आरोग्य सुरक्षा दिली जात असल्याची माहिती मेयोचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी दिली. शहरी भागातल्या रुग्णांसाठी दरमहा उत्पन्नाची मर्यादा १४०० तर ग्रामीण भागातल्या रुग्णांसाठी दरमहा उत्पन्न मर्यादा ११०० इतकी आहे.