ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला कुठेच अडचण नाही, भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष – पंकजा मुंडे
Marathi June 07, 2025 07:25 PM

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मुंबईबाई). महापालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात शिवसेना-मनसे युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच, दोन्ही पक्षातील नेत्यांची वक्तव्ये पाहता लवकरच ही युती होईल, अस वाटते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पत्रकारांना लवकरच बातमी देतो म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर, महायुतीमधील काही नेते या युतीवरुन उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत आहेत. तर, काहींनी या युतीमुळे भाजपला फरक पडणार नसल्याचंही म्हटलं आहे. भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडेंनी (Pankaja munde) देखील ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर भाष्य केलंय. भाजप हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे, ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला कुठेच अडचण येणार नाही असे पंकजा यांनी म्हटलं.

ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला कुठेच अडचण येणार नाही, भाजप हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. देशात भाजपची तिसऱ्यांदा सत्ता आहे तर राज्यातही भाजपचे सरकार आहे. त्यामुळे, ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला अडचण येईल असं मला वाटत नाही. ते, दोघेही मोठे नेते, काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा विचार आहे, असे पर्यावरण मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने  मुंबई महानगरपालिकेत भाजपला अडचण येईल का? याबाबत विचारणा केली असता तुळजापूर दौऱ्यावर असलेल्या पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडली. सध्या, पंकजा मुंडेंकडून राज्यभरातील तीर्थक्षेत्रावर प्लास्टिक मुक्तीचा संकल्प  केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज त्यांनी तुळजापुरात जाऊन स्वच्छता मोहीम हाती घेतल्याचं दिसून आलं.

नितेश राणेंनी उडवली खिल्ली

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेची मंत्री नितेश राणेंनी तुळजापुरात खिल्ली उडवली. आम्हाला झोप लागत नाही, एकाकडे 20 आमदार आणि एकाकडे शून्य यांची एवढी शक्ती आहे. या शक्तीला आम्ही घाबरलो आहोत, आम्हाला घाम फुटला आहे अशा शब्दात नितेश राणेंनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची खिल्ली उडवली. तसेच हिंदुत्त्व सोडल्यामुळेच ठाकरे ब्रँड बुडाल्याचा टोला नितेश राणे यांनी ठाकरेंना लगावला. नितेश राणे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते, त्यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

महाराष्ट्राच्या मनात तेच होईल – उद्धव ठाकरे

मनसेशी युती करणार का? या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी काल मोठं वक्तव्य केलं. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. आता संदेश नाही थेट बातमी देणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे काही आहे ते होणारच असे उद्धव ठाकरे म्हणाले. युतीच्या चर्चांवर आता कोणतेही संकेत देणार नाही, थेट बातमीच देतो असंही ते म्हणाले. युतीसंबंधी जे बारकावे असतील त्यावर आम्ही काय करायचे ते पाहू असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.  उद्धव ठाकरेंचे हे वक्तव्य म्हणजे शिवसेना-मनसे युतीकडे पडलेलं पुढचं पाऊल असल्याची चर्चा आहे.

राज ठाकरे, म्हणाले मातोश्रीवर जातोय

राज ठाकरे जेव्हा जेव्हा पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारतात, तेव्हा त्यांच्या स्टाईलने मिश्कील टिपण्णी करतात, पत्रकारांना गुगली टाकताना पाहायला मिळतात. राज ठाकरे आज त्यांच्या शिवतीर्थ बंगल्यावरुन कारमधून निघाले असताना पत्रकारांनी साहेब कुठे दौरा? असा प्रश्न विचारला. त्यावर मातोश्रीवर जातोय, असं मिश्कील उत्तर राज ठाकरेंनी दिलं. त्यावर, पत्रकारांमध्ये हशा पिकला, मात्र लगेचच मी घरगुती कामासाठी बहिणीकडे जातोय, असे स्पष्टीकरण देखील राज ठाकरेंनी दिलं.

हेही वाचा

एक प्रवास असाही… अन् एकनाथ शिंदेंनी किडनी शस्त्रक्रियेसाठी रुग्ण महिलेला स्वत:च्या विमानातून मुंबईत आणलं

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.