- शिल्पा कांबळे, saptrang@esakal.com
स्त्रियांच्या कष्टांचे, निश्चयाचे, सर्जकतेचे आणि बंडखोरीचे गोडवे आपण वारंवार गातो. पण मी आज माझ्या आजूबाजूच्या सुखवस्तू स्त्रियांकडे पाहते, तेव्हा ‘बंडखोरी केली म्हणजे काय?’ हे कितीतरी जणींना माहितीच नसल्याचे लक्षात येते. सर्व काही बरे चाललेले असताना अनेकींच्या समोरचा कळीचा प्रश्नच वेगळा आहे!
सोशल मीडियाच्या युगात ‘रील्स’ना अतोनात महत्त्व आले आहे. माणसे ‘कंटेन्ट’ पोस्ट करण्यासाठी ‘इव्हेंट्स’ तयार करत आहेत. या बनवाबनवीत स्त्रिया पुरुषांच्या मागे नाहीत. नुकताच ‘गायपट्टया’तील एका राज्यात तयार केलेला एक व्हिडिओ पाहिला. त्यात एक तरुण मुलगी एका मध्यमवयीन रिक्षावाल्याला अमानुष मारहाण करत आहे.
अगदी त्या रिक्षावाल्याच्या अंगावर बसून त्याला फटके देत आहे. तिची सख्खी बहीण या मारहाणीचा व्हिडिओ अत्यंत व्यावसायिक पद्धतीने शूट करत आहे! रिक्षावाल्याचा गुन्हा काय, तर त्याने या मुलींना भाड्याचे पैसे मागितले. मुलींचे म्हणणे असे, की रिक्षावाल्याने त्यांना शिवीगाळ केली. खरेखोटे ते तिघेच जाणोत.
एवढे मात्र खरे, की ती मुलगी ‘कंटेन्ट क्रिएटर’ आहे आणि तिने स्वतःचे अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत. ‘व्हायरल’ होण्यासाठी कोणत्याही थराला जायची तिची तयारी असल्याचे त्यावरून लगेच समजते. हा व्हिडिओ बघून मला प्रश्न पडला, की या दोन बहिणींचे नेमके करायचे काय?...
माझ्या ओळखीच्या घरातला प्रसंग. अगदी तुम्हालाही ओळखीचा वाटेल असा! मुलगी ‘प्रेमलग्न’ करून घरी आलेली. नोकरी करत नव्हती आणि शोधायची इच्छाही नव्हती. सासू-सासरे वयस्क. आयुष्यभर कष्ट करून थकलेले. सुनेने स्पष्ट शब्दात सांगितले, ‘सासूमाँ, मला स्वयंपाक करता येत नाही. तुम्हीच छान करता!’ सासू एकुलत्या एका मुलाच्या बायकोला त्रास नको म्हणून सगळा स्वयंपाक स्वतःच करते.
सुनेला दिवसभर इतर कामे करायलाही फुरसत नसते. पलंगावर रील्स पाहात तिचा अख्खा दिवस जातो. आता तुम्ही म्हणाल, की ‘प्रेमलग्ना’ची म्हणून मुलगी अशी वागत असेल! मी मुद्दामच आधी प्रेमलग्न लिहीले! खरेतर सासूनेच शोधली होती ती मुलगी आपल्या मुलासाठी. ॲरेन्ज मँरेज! आता सासूला प्रश्न पडला असेल ना, की या सुनेचे नेमके करायचे काय?...
माझ्या एका मैत्रिणीचा भाऊ एकदम ‘फ्रस्ट्रेट’ होऊन सांगत होता. त्याच्या बायकोने मुले झाल्यावर शरीरसंबंधांना एकदम नकार द्यायला सुरूवात केली. बरे, यांच्या संसारात मुले आणि हे दोघे. गाड्या, चांगला पगार, नोकरचाकर, दागिने, सुखाची सारी साधने त्यांच्या हाताशी आहेत.
नवऱ्याच्या पैशांचा पुरेपूर उपभोग घेणारी त्याची बायको म्हणते, की मला या संबंधांची किळस येते! तो तिला म्हणाला, की आपण काउन्सिलरकडे जाऊ. पण तिला काउन्सिलिंग वगैरे फालतू वाटते! तिचा मुद्दा हा, की ‘आता दोन मुले झाली, तर शरीरसंबंधांची काय गरज आहे?’ या दोघांचे वय चाळीशीचे. तो वैतागून तिला म्हणाला, ‘आता मी पुढे काय करावे?’ तिने स्पष्ट उत्तर दिले- ‘चांगल्या कॉलगर्ल्सकडे जात जा ना!
भरपूर पैसे दिले तरी आपले काय बिघडणार आहे?’ दिवसभर ती काय करत असेल?... सकाळी उठल्या उठल्या ती पहिले आपले वजन मोजते. मग दिवसाचा डाएट प्लॅन लिहून काढते. पुढे दिवसभर स्वतःच्या नाचाचे व्हिडिओ करते... ‘मैंने छुरी चलाई... उसे छोडके में आयी... रब्बा रब्बा!’ आता या बायकोचे त्याने नेमके करायचे काय?...
हे किस्से आठवताना मला काही वेगळेच संदर्भ असलेल्या गोष्टी आठवतायत. रोझा पार्क या अमेरिकेतील एक साध्या, कष्टकरी, काळ्या वंशाच्या बाई होत्या. वंशद्वेषाच्या त्या काळात (१९५१) श्वेतवर्णीय लोकांना बसमध्ये बसायला मिळावे म्हणून काळ्या लोकांना उभे राहून जागा रिकामी करून द्यावी लागायची.
एके दिवशी बसमध्ये गर्दी असल्याने कंडक्टरने रोझा यांना त्यांच्या जागेवरून उठायला सांगितले, जेणे करून एका गोऱ्या पुरूषाला ती जागा द्यावी. किती छोटी गोष्ट! पण रोझा यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. चिडलेल्या कंडक्टरने पोलिसांना बोलावले. रोझा यांना अटक झाली. पण त्यांची बंडखोरी निरर्थक ठरली नाही.
पुढे काळ्या लोकांनी एकत्र येऊन बससेवेवरच बहिष्कार घातला. शाळा, नोकरीच्या ठिकाणी काळे लोक चालत जाऊ लागले. एक मोठे आंदोलनच सुरू झाले. अमेरिकेतल्या अनेकांना तेव्हा प्रश्न पडला होता, की या रोझा पार्कचे करायचे काय?...
विलक्षण बायकांच्या गोष्टी सांगण्यासाठी दूर अमेरिकेत जायची गरज नाही. समाजवादी नेत्या मृणाल गोरे हे नाव कदाचित आजच्या नव्या पिढीतल्या अनेकांना माहिती नसेल. या रणचंडिकेने अहिल्याबाई रांगणेकर, प्रमिला दंडवते या धडाडीच्या कार्यकर्त्या मैत्रिणींबरोबर मिळून मुंबईत पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला होता.
पाण्याच्या प्रश्नासाठी हजारो बायका रस्त्यावर गोळा झाल्या होत्या. सरकारला त्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी लागली होती. सुस्त सरकारी यंत्रणेवर यांच्या मोर्च्यांची इतकी दहशत असायची, की सत्ताधारी पक्षाला प्रश्न पडायचा, की हक्कांसाठी रत्यावर उतरणाऱ्या या बायकांचे करायचे काय?...
भारताला बंडखोर स्त्रियांची मोठी परंपरा आहे. बाराव्या शतकात अक्का महादेवी या संत कवयित्री आपल्याकडे होऊन गेल्या. मी ऐकलेली त्यांच्या आयुष्याची गोष्ट अशी आहे- शिवभक्त असलेल्या अक्का महादेवींचे जबरदस्तीने राजाशी लग्न लावले गेले. राजाला त्यांनी कधीच पतीचा दर्जा दिला नाही. आपल्या वैभवाला अक्का महादेवी भुलत नाही, म्हणून चिडलेल्या राजाने त्यांना राज्याबाहेर जाण्याची शिक्षा दिली.
‘माझ्या मालकीची एकही गोष्ट तुझ्याकडे असता कामा नये,’ अशी ती शिक्षा होती. अक्का राजमहालातून बाहेर पडल्या. वस्त्रांविना, केसांनी अंग झाकून त्या निघाल्या आणि लिंगायत पंथाच्या अनुभवमंडपात पोहोचल्या. उड्डताडी (गाव) ते श्रीशैलम पर्वत असा प्रदीर्घ प्रवास त्यांनी हिमतीने, एकटीने केला. मुक्तीचा मार्ग स्वीकारला.
संतकवयित्रींप्रमाणेच वीरमाता आठवतात. शिवबांना स्वराज्याचे स्वप्न दाखवणाऱ्या आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या राजमाता जिजाई, राज्यकारभाराचे शिवधनुष्य लीलया पेलणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, समाजकार्यासाठी घराबाहेर पडलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, या महान, कर्तबगार स्त्रियांना, त्यांच्या प्रचंड कार्याला पाहून त्या काळच्या पारंपरिक पुरूषसत्तेलाही प्रश्न पडला असेल... या निश्चयी स्त्रियांना नेमके थांबवायचे कसे?...
आजच्या अनेक सुखवस्तू स्त्रियांसमोर प्रश्न आहे, की आपल्या मोकळ्या वेळाचे काय करावे?... त्यांना बंडखोरी कशासाठी करायची, ते माहीत नाही. आपल्याला सवंग, उथळ करमणुकीचे साधन म्हणून रील्स बनवत/ पाहात स्वतःची सर्जकता संपवायचीय, की आयुष्य बदलण्यासाठी, ते अधिकाअधिक अर्थपूर्ण, सुंदर करण्यासाठी सर्जकता पणाला लावायचीय?
स्त्रियांसमोर दोन रस्ते आहेत- एक रस्ता आहे शॉर्टकट प्रसिद्धीचा. डोपामाईनचे ‘शॉर्ट शॉट्स’ देणारा. तर दुसरा निश्चयाचा. तो ‘स्व’ आणि इतरांच्या मुक्तीचा मार्ग आहे. स्त्रियांनीच शेवटी ठरवायचे आहे, की त्यांना त्यांच्या सुंदर आयुष्याचे नेमके काय करायचे आहे.
मार्ग कठीण आहे. पण,
‘पोरकी समजून मज ना त्रस्त करावे
काही केल्याने मी मुळी भिणारी नव्हे
जगेन रे वाळला पाला खाऊन
जगेन रे पाषाणावरी निजून
सत्वपरीक्षा घेता आणि सतावून
होईन शुद्ध तनु नि प्राण अर्पून
तुम्हांठाई चेनमल्लिकाजुर्ना’
हे अक्का महादेवींनी त्यांच्या वचनात सांगून ठेवले आहे. आपल्याला फक्त हिम्मत दाखवायची आहे!