Prakash Mahajan : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मनसे आणि ठाकरे पक्षाच्या युतीची चर्चा चालू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपा आणि शिंदे गटकडून मात्र या संभाव्य युतीवर टीका केली जात आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी काहीही फरक पडणार नाही, असा दावा भाजपाच्या नेत्यांकडून केला जात आहे. एवढं घाबरलोय की आम्हाला झोप लागत नाही, अशी खोचक टीका भाजपाचे नेते नितेश राणे यांनी केली आहे. राणे यांच्या याच टीकेला मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी खरमरीत टीका केली आहे. त्यांनी नितेश राणे यांना लवंग आणि विलायची उपमा दिली आहे.
प्रकाश महाजन हे पुण्यात टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. यावेळी त्यांनी मनसे आणि ठाकरे गटाची संभाव्य युती, शरद पवारांचे या युतीवरील मत, नितेश राणे यांनी केलेली खोचक टीका यावर प्रतिक्रिया दिली. एका पक्षाचे 20 आमदार आहेत तर दुसऱ्या पक्षाचे शून्य आमदार आहेत. त्यांची भरपूर ताकद आहे. आम्ही आता एवढे घाबरलो आहोत की आम्हाला झोप लागत नाहीये. आमचं कसं होणार या प्रश्नाचा विचार करून आमच्या अंगाला घाम फुटतो आहे, अशी उपरोधिक टीका मंत्री नितेश राणे यांनी केली होती. त्यावर आता प्रकाश महाजन यांनी नितेश राणेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.
त्यांनी रत्नागिरीत राज ठाकरे यांच्या सभा कशाला घ्यायला लावल्या. त्यावेळी तर राज ठाकरे यांच्या घरी गेले होते. नितेश राणे यांना मी गांभीर्याने घेत नाही. राणे यांना वैचारिक खोली तर नाहीये. त्यांची वैचारिक उंची म्हणजे ते उभे राहिले तर लवंगेएवढी होते आणि ते बसले तर विलायची एवढी होते. त्यामुळे अशा माणसाला कशाला गांभीर्याने घ्यायचं नितेश राणे हे त्यांच्या वैचारिक उंची आणि वैचारिक रुंदीप्रमाणे सल्ले देत असतात, अशी खोचक प्रतिक्रिया प्रकाश महाजन यांनी दिली.
तसेच, राणे कुटुंबातील दोन वडील आणि दोन मुलांना आम्ही भाजपाचे खूप निष्ठावान आहोत, असे सांगावे लागते. त्यामुळेच हे असे करत असतात. राज ठाकरे यांनी सिंधुदूर्ग किंव कणकवली येथे राणे यांच्यासाठीच सभा घेतली होती. त्या सभेत मीदेखील भाषण केले होते. त्यामुळेच सर्व राणेंनाच गांभीर्याने घ्यायला नकोय, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.