भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यात एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. शुबमन गिल टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यानंतर शुबमन गिलची कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली. शुबमन इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतून कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. त्यामुळे शुबमनच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. मात्र त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यर याच्या नावाची चर्चा पाहायला मिळत आहे. श्रेयसने नुकतंच त्याच्या नेतृत्वात पंजाब किंग्सला आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीपर्यंत पोहचवलं होतं.
शुबमन गिल याने त्याच्या नेतृत्वात आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्सला प्लेऑफपर्यंत पोहचवलं होतं. मात्र गुजरातला अंतिम फेरीपर्यंत पोहचण्यात अपयश आलं. मात्र श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल या दोघांनी फलंदाज आणि कर्णधार म्हणून अप्रतिम कामगिरी केली. श्रेयस कर्णधार म्हणून पंजाबला आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात अपयशी ठरला. मात्र त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आता त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, श्रेयस अय्यर याने कर्णधार म्हणून केलेल्या कामगिरीनंतर चाहत्यांसह बीसीसीआयचं मनं जिंकलं आहे. रिपोर्ट्सनुसार, श्रेयस अय्यर भविष्यात भारतीय वनडे/टी 20 संघाचा कर्णधार होण्याच्या शर्यतीत आहे. रोहित शर्मा वनडे तर सूर्यकुमार यादव टी 20i संघाचा कर्णधार आहे. मात्र भविष्यात बदलाच्या स्थितीत अय्यर कर्णधाराच्या शर्यतीत आहे. त्यामुळे वनडे टीमचा उपकर्णधार असलेल्या शुबमन गिलसाठी ही चांगली बातमी नाही, असं म्हटलं तर चूक ठरणार नाही.
श्रेयस अय्यर याच्यासाठी गेली 15 महिने फार खास राहिली आहेत. श्रेयस अय्यर याने कोलकाता नाईट रायडर्सला आपल्या नेतृत्वात आयपीएल 2024 चं विजेतेपद मिळवून दिलं होतं. त्यानंतर श्रेयसने मुंबईला सय्यद मुश्ताक अली 2024-2025 ट्रॉफी जिंकून दिली होती. मुंबईने अंतिम सामन्यात मध्य प्रदेशवर मात केली होती. तर श्रेयसने इराणी कप 2024-25 ट्रॉफीही जिंकून दिली.
श्रेयसने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील एकूण 17 सामन्यांमध्ये 50.33 च्या सरासरीने 604 धावा केल्या. श्रेयसने या दरम्यान 6 अर्धशतकं झळकावली. तसेच श्रेयस आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 3 संघांना अंतिम फेरीत पोहचवणारा पहिला कर्णधारही ठरला.
श्रेयस अय्यर याने वनडे क्रिकेटमध्येही उल्लेखनीय कामगिरी केलीय. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. श्रेयसने या विजयात निर्णायक भूमिका बजावली. श्रेयसने या स्पर्धेतील 5 सामन्यांमध्ये 2 अर्धशतकांसह 243 धावा केल्या. तर 2023 वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील 11 सामन्यांमध्ये 66.25 च्या सरासरीने 530 धावा केल्या. श्रेयसने या दरम्यान 2 शतकं आणि 3 अर्धशतकं झळकावली होती.