क्रिकेटर पृथ्वी शॉ गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. पृथ्वी शॉ याने त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून दिला. तसेच पृथ्वीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही दणक्यात सुरुवात केली. त्यामुळे पृथ्वीची दिग्गज सचिन तेंडुलकर याच्यासह तुलना करण्यात आली. मात्र पृथ्वीला ते स्टारडम टिकवता आलं नाही. पृथ्वीला त्याच्या निराशाजनक कामगिरीमुळे टीम इंडियानंतर मुंबई टीममधूनही बाहेर व्हावं लागलं. पृथ्वीला त्याच्या कामगिरीवरुन आणि फिटनेसवरुन ट्रोल करण्यात आलं. पृथ्वीला आतापर्यंत धावांसाठी संघर्ष करावा लागला. इतकंच काय पृथ्वीला टी 20 मुंबई लीगमध्येही संघर्ष करावा लागला. त्यामुळे पृथ्वी टीकेचा धनी ठरला. मात्र अखेर पृथ्वीला सूर गवसला आहे.
कर्णधार पृथ्वीने टी 20 मुंबई स्पर्धेतील 19 व्या सामन्यात नॉर्थ मुंबई पँथर्स टीमकडून खेळताना ट्रायम्फ्स नाईट्स एमएनई विरुद्ध तडाखेदार अर्धशतक झळकावलं. पृथ्वीने केलेल्या अर्धशतकामुळे नॉर्थ मुंबई पँथर्सला 200 पार मजल मारता आली. पृथ्वीने या सामन्यातील पहिल्या डावात स्फोटक खेळी केली.
कर्णधार पृथ्वीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पृथ्वीने या संधीचा चांगलाच फायदा घेत 75 धावांची वादळी खेळी केली. पृथ्वी ज्या वेगाने खेळत होता त्यानुसार त्याला सहज शतक करण्याची संधी होती. मात्र तसं होऊ शकलं नाही. पृथ्वी 10 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर आऊट झाला. सूर्यांश शेंडगे याने पृथ्वीला पार्थ नाईक याच्या हाती कॅच आऊट केलं.
पृथ्वीने 34 बॉलमध्ये 220.59 च्या स्ट्राईक रेटने 75 रन्स केल्या. पृथ्वीने त्यापैकी 66 धावा या फक्त 15 चेंडूत केल्या. पृथ्वीने या 66 धावा चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. पृथ्वीने या खेळीत 3 षटकार आणि 12 चौकार लगावले.
पृथ्वी व्यतिरिक्त हर्षल जाधव याने संघासाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. हर्षलने 30 चेंडूत 46 रन्स केल्या. तसेच इतरांनीही योगदान दिलं. त्यामुळे नॉर्थ मुंबई पँथर्सला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 207 रन्स करता आल्या. आता पृथ्वीच्या नेतृत्वात टीम जिंकते का? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
नॉर्थ मुंबई पँथर्स प्लेइंग ईलेव्हन : पृथ्वी शॉ (कर्णधार), दिव्यांश सक्सेना (विकेटकीपर), अर्जून जैस्वाल, हर्षल जाधव, आयुष वर्तक, सौरभ सिंग, गौरव जठार, प्रवेश पाल, राहुल सावंत, प्रिन्स बडियानी आणि प्रतीक मिश्रा.
ट्रायम्फ्स नाईट्स एमएनई प्लेइंग ईलेव्हन : सिद्धांत अद्धटराव, परीक्षित वळसंगकर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), सूर्यांश शेडगे, पार्थ कुणाल नाईक, शिखर ठाकुर (विकेटकीपर), मकरंद गिरीश पाटील, मिनाद मांजरेकर, जय संजय जैन, श्रेयस गुरव आणि हृषीकेश भूषण गोरे.