मुंबई : कुर्ल्यातील मदर डेअरीची जमीन पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असताना केवळ अदानींच्या आग्रहाखातर ती हस्तांतरित करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयाला जनतेचा तीव्र विरोध असतानाही सरकारने ती जमीन अदानींना बहाल केली, अशी टीका मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
मदर डेअरीची जमीन अदानींना देण्याच्या निर्णयाविरोधात खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कुर्ल्यात स्थानिकांसह काँग्रेसने जोरदार आंदोलन करीत निषेध नोंदवला. ‘‘आम्ही शांततेने आंदोलन करीत असताना पुन्हा एकदा सरकारने लोकांचा आवाज दडपण्यासाठी मोठा पोलिस फौजफाटा पाठविला होता व पोलिस बळाच्या जोरावर शांततापूर्ण आंदोलन रोखले. हा कुठला न्याय? सरकार लोकांचे हक्क हिरावून घेत आहे. याविरोधात आम्ही लढत राहू,’’ असा इशारा गायकवाड यांनी दिला.
आंदोलनात आमदार ज्योती गायकवाड, सुभाष भालेराव, काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस आदी उपस्थित होते. कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर शेकडो वर्षांचे जुने मोठे वृक्ष आहेत. या जागेवर जैववैविध्य उद्यान करावे, अशी स्थानिकांची मागणी आहे. या जागेचे बाजारमूल्य शेकडो कोटी रुपये आहे; पण अदानींच्या फायद्यासाठी सरकारने मागणीकडे दुर्लक्ष करीत ही जमीन नाममात्र दराने त्यांना दिली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.