मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी युतीसाठी दिलेल्या टाळीला शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिटाळी दिली आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेमध्ये अद्याप युती झालेली नाही. असे असले तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला दोन्ही पक्ष एकत्र येतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण दोनच दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे म्हणाले होते की, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे, तेच होईल. तसेच संदेश कशाला, मी बातमीच देईन तुम्हाला, असेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे दोन भाऊ एकत्र कधी येणार? याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे. मात्र त्याआधीच पक्षातील नेते एकत्र येताना दिसत आहेत. (Leaders of both parties were in touch even before Raj Thackeray and Uddhav Thackeray came together)
गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे येण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र त्याआधी दोन्ही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीच्या शिळफाटा येथील पलावा पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे आणि मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्यासह दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर तीनच दिवसांपूर्वी नाशिकच्या ठक्कर बाजार येथील मनसेच्या राजगड कार्यालयात वास्तुशांती आणि सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते दत्ता गायकवाड, सुनील बागूल, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी महापूजेसाठी उपस्थिती लावली होती. अमरावतीतही दोन्ही पक्षाच्या नेत्याही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासाठी घोषणाबाजी केली होती. अशातच आता दोन्ही पक्षाचे मोठे नेते एकत्र दिसत आहेत.
हेही वाचा – Chandrahar Patil : उद्धव ठाकरेंना धक्का; चंद्रहार पाटील यांनी सरकारसोबत जाण्याचं सांगितलं कारण
मुंबईच्या दादर येथील एका लग्न सोहळ्यामधला व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू आणि मनसे नेते नितीन सरदेसाई हस्तांदोलन करताना दिसत आहे. यावेळी सुनील प्रभू नितीन सरदेसाई यांना म्हणताना दिसत आहेत की, “जोरात बोलुया.” तर शिवसेने ठाकरे गटाच्या उपनेत्या विशाखा राऊत आणि मनसे नेते बाळा नांदगावकर हे नवरा-नवरीच्या बाजूला उभे राहून फोटो काढताना दिसत आहेत. यावेळी दोघांमध्ये काहीतरी चर्चाही झाली. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीचे यापूर्वी झालेले प्रयत्न अयशस्वी झाले असले तरी दोन्ही बंधू पुन्हा एकदा एकत्र येणार का? ते पाहावं लागेल.
हेही वाचा – Bacchu Kadu : मी मेलो तरी सरकारला फरक पडणार नाही; अन्नत्याग आंदोलनावेळी बच्चू कडूंनी सांगितलं कारण