तानुबार्इंचा जन्म 1876 मध्ये, नाशिक जिल्ह्यातील गंगापूरच्या खानदानी मराठा कुटुंबात झाला. देवराव कृष्णराव ठोसर यांची ती कन्या. देवराव हे जोतिबा फुले यांचे विश्वासू सहकारी होते. तानुबार्इंचे शिक्षण वेताळ पेठेत असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत झाले. त्यांचा विवाह पुणे येथे वासुदेवराव बिंगोजी बिर्जे यांच्याबरोबर 26 जानेवारी 1893 रोजी झाला. वासुदेवराव बिर्जे हेही समाजसुधारक विचारांचे होते. वासुदेवराव बिर्जे यांनी नारायण मेघाजी लोखंडे, गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामैय्या आय्यावारू यांच्यासमवेत सामाजिक कार्यात सहभाग घेतला होता. १८९७मध्ये दीनबंधु या वृत्तपत्राची जबाबदारी वासुदेव बिर्जे यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि १९०६ सालापर्यंत त्यांनी वृत्तपत्र चालवलं. मात्र काही काळानंतर त्यांचा प्लेगच्या आजारामुळे त्यांचे निधन झाले.
पतीच्या निधनानंतर तानुबार्इंनी संपादक म्हणून, ‘दीनबंधू‘चा लौकिक वाढवला. त्यांनी त्या पत्रात विविध विषय हाताळले. त्या त्यांच्या अग्रलेखाची सुरुवात तुकोबांच्या अभंगाने करत. समाजाला आत्मभान यावं म्हणून संत तुकाराम महाराजांचे अभंग तानुबाई वृत्तपत्रात प्रसिद्ध करत असत. त्यांनी स्वतः लिहिलेल्या राजकीय लेखांमध्येही तुकाराम महाराजांच्या अभंगाचा संदर्भ असे. त्यांचा भर कृषी, शिक्षण, राजकारण, समारंभ, मराठा व इतर जातींच्या परिषदा आणि विशेष करून ‘सत्यशोधक चळवळी’चे वृत्तांत यांवर होता. तानुबाई बिर्जे या पहिल्या महिला पत्रकार ज्यांनी सत्यशोधक पद्धतीने पत्रकारिता करत समाजात विचारांची देवाण-घेवाण करत बदल घडवला. स्त्री पुरूष समानता त्यांच्या लेखनातून डोकावत राहते. तानुबाईंनी 1908 पासून ते 1913-14 पर्यंत ‘दीनबंधू’चं संपादन केलं. त्यांच्या या संपादकीय कारकिर्दीत ‘दीनबंधू’ हे वृत्तपत्र बहुजन समाजाचा आधार बनलं होतं. सत्यशोधक समाजाला दिशा देण्याचं काम या वृत्तपत्रानं केलं.
‘दीनबंधू‘मध्ये 1912 मध्ये एक नवी लेखमाला सुरू करण्यात आली होती. ‘भारतासारख्या खंडप्राय देशात लोकशाही शासनप्रणाली का लागू करू शकत नाही? त्यासाठी भारत देश लायक नाही का?’ या विषयावर सखोल चिंतन, लेखन व चर्चा या माध्यमातून करण्यात आली होती.
खडतर शब्दांमध्ये आपल्या लेखनातून रोखठोक प्रश्न विचारण्याची धमक त्याकाळी तानुबाई बिर्जेंनी आपल्या अग्रलेखांमधून दाखवली. आजच्या महिला पत्रकारांसाठी त्यांचा हाच पवित्रा अनुकरणीय आहे.