इंदौरच्या राजा रघुवंशी याचा मृतदेह सापडल्यानंतर आठवड्याभराने अखेर त्याची पत्नी सोनमचा शोध संपला आहे. उत्तर प्रदेशातील गाझीपूर इथं तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं. एका ढाब्यावरून तिने घरी फोन केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, सोनमसह पोलिसांनी एकूण चौघांना राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे. सोनमने राजा रघुवंशीच्या हत्येसाठी तिघांना सुपारी दिली होती आणि त्यानंतरच मेघालयात त्याची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. तर, कुटुंबियांनी पोलीस खोटं सांगत असल्याचा आरोप केला आहे.
सोनम आणि राजा रघुवंशी यांचं ११ मे रोजी लग्न झालं. त्यानंतर २० मे रोजी ते मेघालयातील शिलाँग इथं हनीमूनला गेले होते. २३ मे रोजी त्यांच्याशी अखेरचा संपर्क झाला होता. त्यानंतर २४ मे रोजी त्यांची स्कुटी बेवारस स्थितीत आढळली. तर २ जूनला वेई सॉडोंग धबधब्याजवळ खोल दरीत राजा रघुवंशीचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि राजाची पत्नी सोनमचा शोध घेतला जात होता.
बेपत्ता झाल्यानंतर १७ दिवसांनी राजा रघुवंशीची पत्नी सोनम ९ जून रोजी गाझीपूरमधील एका ढाब्यावर सापडली. तिने ढाब्यावरून कुटुंबियांना फोन करून आपण कुठे आहे ते सांगितलं. कुटुंबियांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली आणि यानंतर गाझीपूर पोलिसांनी सोनमला ताब्यात घेतलं.
पोलिसांनी सोनमला पती राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणी अटक केलीय. यावर सोनमचे वडील देवी सिंह रघुवंशी यांनी सांगितलं की, मुलगी मला भेटेल तेव्हा सत्य समोर येईल. पण पोलीस आणि हॉटेलमध्ये दिसलेल्या दोन तरुणांचा यात हात आहे. मध्य प्रदेशातील तिघांना अटक केलीय त्यांच्या चौकशीत सत्य समोर येईळ. पोलीस जे सांगतायत ते खोटं आहे. आमचा कुणाशीही वाद नव्हता. आता पोलिसांनीच खुलासा करावा.