वणी, त्र्यंबकेश्वर - सुट्यांचा अखेरचा आठवडा तसेच सलग दोन दिवस असलेल्या सुट्यांचा योग साधत रविवारी (ता. ८)आदिमाया सप्तशृंगीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. दुसरीकडे त्र्यंबकेश्वर येथे सलग तीन दिवसांपासून भाविकांची गर्दी वाढल्याने दर्शनासाठी तीन ते चार तास लागत होते.
आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर रविवारी (ता. ८) उन्हाळी सुट्यांच्या अखेरच्या चरणात राज्यासह गुजरातमधील भाविक व पर्यटक तीर्थाटन व पर्यटनासाठी घराबाहेर पडले आहेत. यात बहुतांश भाविक सप्तशृंगगड, शिर्डी, पंचवटी, त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्राबरोबरच सापुतारा या पर्यटनस्थळी भेटीचे नियोजन करीत घराबाहेर पडले आहेत. शनिवारी बकरी ईद व रविवारच्या सुटीमुळे गडावर भाविकांची आदिमायेच्या दर्शनासाठी रीघ लागली होती. हजारो भाविक खासगी वाहनांनी गडावर येत असल्याने नांदुरी ते सप्तशृंगगड या दहा किलोमीटरच्या घाटरस्त्याबरोबरच नाशिक-नांदुरी, कळवण-नांदुरी, वणी-सापुतारा हे रस्ते वाहनांच्या गर्दीने भरून वाहत होते.
पर्यटक व भाविकांची फ्युनिक्युलर रोपवेद्वारे मंदिरात जाण्यासाठीही भाविकांची अधिक पसंती होती. त्यामुळे रोपवे कॅम्पसमध्ये व प्रतीक्षालयात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दीड ते दोन तासांनंतर भाविक मंदिरात दर्शनासाठी पोहोचत होते. पायरी मार्गाने भाविकांची गर्दी असल्याने रामटप्प्याच्या आसपास भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. तीर्थयात्रेसाठी बहुसंख्य भाविक स्वत:ची किंवा भाडोत्री खासगी वाहानाने येत असल्यान गडावरील खासगी पार्किंगसह रस्त्याच्या दुतर्फा जागा वाहनांनी भरून गेली होती.
स्थानिकांना रोजगार
भाविकांच्या गर्दीने रोप वे प्रवेशद्वार ते शिवालय तलाव परिसर तसेच पहिली पायरी परिसरातील दुकाने व भाविकांच्या वर्दळीमुळे गडावर यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. गर्दीमुळे सापुतारा-वणी-नाशिक रस्त्यावरील हॉटेल व्यवसायही तेजीत होता. वणी ते नांदुरी रस्त्याच्या दुतर्फा ठिकठिकाणी डोंगराची काळी मैना (करवंदे), जांबळे, गावठी आंबे, आवळा असा रानमेवा विकणाऱ्या आदिवासी महिला, पुरुष व लहान मुलांनाही वर्दळीमुळे रोजगार मिळत आहे.
त्र्यंबकेश्वर- उन्हाळी सुट्या संपत आल्याने येथे भाविकांच्या गर्दीत तीन दिवसांपासून मोठी भर पडली होती. परराज्यासह राज्यातील भाविकांनी कालपासून गर्दी केल्याने अवघे त्र्यंबकेश्वर शहर हाउस फुल्ल झाले होते. अचानक वाढलेल्या या गर्दीमुळे दर्शनासाठी तब्बल तीन ते चार तास थांबावे लागत होते. अनेकांनी दर्शन पास घेऊनही रांगेत थांबावे लागत असल्याने त्रागा व्यक्त केला. दरम्यान, या गर्दीवर नियंत्रणासाठी प्रशासन व ट्रस्टने तातडीने मार्ग काढावा; अन्यथा सिंहस्थ काळात काय परिस्थिती राहील, याची कल्पनाही करू शकत नाही, अशा प्रतिक्रिया भाविक व्यक्त करीत होते.
सुट्यांमुळे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी रोज मोठ्या प्रमाणावर गर्दी सुरू होती. सध्या सलग दोन दिवस सुट्यांळे त्र्यंबकेश्वर भाविकांच्या गर्दीमुळे हाउस फुल्ल झाले होते. शुक्रवारपासूनच शहरात भाविकांची गर्दी झाली होती. सकाळी साडेपाच ते रात्री साडेदहापर्यंत दर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या. माणशी देणगी दर्शन दोनशे रुपये देऊनही तीन तासांचा कालावधी लागत होता. पूर्व दरवाजाच्या रांगेतला भाविक सात तासांनी बाहेर पडत होता. उदासीन आखाड्याकडे व पूर्वेला जिल्हा उपरुग्णालयापर्यंत रांगा दिवसभर कायम होत्या.
येथील शंकराची पिंडी गर्भगृहात खाली असून, वेगळी असल्यामुळे तिच्या दर्शनाची आस मनात ठेवून भाविक येथे येतात. परंतु गर्दीच्या नियोजनाअभावी अनेकांना निराश होऊन परत जावे लागते. दुसरीकडे बाहेरील राज्यातून येणाऱ्या भाविकांना भाषेची अडचण होते. त्यांनी आणलेली वाहने अडवून नको तिथे लावण्यास सांगून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली जाते. थोड्या कालावधीत पालिकेचा ठेकेदार जामर लावून वाहनांना मोठ्या प्रमाणावर दंड वसूल करतो. ही दंडाच्या आडून परराज्यातील भाविकांना लुटणाऱ्यांची येथे साखळी तयार झाली आहे.
...तर त्र्यंबकेश्वरची अर्थव्यवस्था टिकेल
परराज्यातील भाविक पावलोपावली दर्शन पासची चौकशी करत फिरतात. त्यांना झटपट दर्शन करून देणारे काही प्रख्यात लोक असून, त्यांच्या मोठ्या रकमा ठरलेल्या आहेत. हे सगळे बिनधास्त सुरू असून, कुणीही गांभीर्याने घेत नसल्याने ‘पहिले होते तसेच चालू द्या’ याप्रमाणे भाविकांची गैरसोय सुरू आहे. भाविकांमुळे त्र्यंबकेश्वरचे सर्व चलनवलन सुरू असून, त्यांना केंद्रबिंदू मानून योजना केल्यास व व्यवस्था करण्यात आल्या तरच येथील अर्थव्यवस्था टिकून राहील हेही ध्यानात घ्यायला हवे.