गेल्या महिन्यात भारत-पाकिस्तानात संघर्ष पहायला मिळाला होता. यानंतर पाकिस्तानमधील परिस्थिती आणखीच खराब होत आहे. पाकिस्तान वाईट परिस्थितीचा सामना करत आहे. या देशावर उपासमारीचे संकट आहे. जागतिक बँकेच्या अहवालातून याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानची सुमारे ४५% लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली जगत असल्याचे समोर आले आहे. तसेच एकूण लोकसंख्येपैकी १६.५ टक्के लोक असे आहेत जे गरिबीच्या अत्यंत खालच्या पातळीपर्यंत पोहोचले असल्याचेही जागतिक बँकेने म्हटले आहे. या लोकांवर उपासमारीची वेळ आहे.
काय आहे जागतिक बँकेचा अहवाल?
जागतिक बँकेच्या अहवालानुसार, २०२४-२५ या एका वर्षात पाकिस्तानमध्ये सुमारे १.९ दशलक्ष लोक दारिद्र्यरेषेखाली गेले आहेत. पाकिस्तानचा आर्थिक विकास दर २.६% आहे, जो गरिबी कमी करण्यासाठी पुरेसा नाही. आता २०२५ च्या आर्थिक वर्षात पाकिस्तानचा गरिबी दर ४२.४% राहणार आहे. तसेच पाकिस्तानची लोकसंख्या दरवर्षी सुमारे २% ने वाढत आहे, त्यामुळे या वर्षी सुमारे १९ लाख लोक दारिद्र्यरेषेखाली जाण्याची भीती आहे.
शेतीची अवस्था वाईट
पाकिस्तानात २०२५ मध्ये सरासरीपेक्षा ४० टक्के कमी पाऊस झाला आहे, त्यामुळे कृषी उत्पादनात मोठी घट झाली. कापसाचे उत्पादन २९.६ टक्के आणि भाताचे उत्पादन १.२ टक्क्यांनी घटल्याचे समोर आले आहे. यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्याने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. यामुळे शेतीच्या उत्पादनात आणखी घट झाली आहे.
भारतातील गरीबी घटली
भारतातील गरिबीत राहणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. भारतात २०११-१२ मध्ये गरीब लोकांची टक्केवारी २७.१ टक्के होती, ती २०२२-२३ मध्ये ५.३ टक्के झाली आहे. त्यामुळे आता भारतात केवळ ५.३ टक्के लोक गरीब आहेत. जागतिक बँकेने गरिबीची व्याख्या बदलली असून जो व्यक्ती प्रतिदिन तीन डॉलरपेक्षा कमी कमावतो ते गरीब गणला जातो. ग्रामीण भागातील गरिबी १८.४ टक्क्यांवरून २.८ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे आणि शहरी भागात ती १०.७ टक्क्यांवरून १.१ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे, ज्यामुळे ग्रामीण-शहरी अंतर ७.७ टक्क्यांवरून १.७ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.