Financial Fraud : सुवर्ण भिशीच्या नावाखाली 'श्री ज्वेलर्स'कडून ४२ लाखांची फसवणूक; गुंतवणूकदारांचे पैसे, २१ तोळे सोने घेऊन लंपास
esakal June 10, 2025 06:45 AM

पुणे/ खडकवासला : सुवर्ण भिशी योजनेच्या आमिषाने धायरीतील ‘श्री ज्वेलर्स’ या सराफी पेढीच्या मालकाने तब्बल ३६ गुंतवणूकदारांची ४२ लाख ७८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तसेच, २१ तोळे सोन्याचे दागिने घेऊन दहिवाळ दांपत्य फरार झाले आहे.

या प्रकरणी नऱ्हे येथील एका व्यावसायिकाने सोमवारी (ता. ९) फिर्याद दिली. त्यानुसार नांदेड सिटी पोलिसांनी ‘श्री ज्वेलर्स’चा मालक विष्णू सखाराम दहिवाळ आणि त्याची पत्नी स्वाती ( दोघे रा. रासकरमळा, धायरी) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण कायदा (एमपीआयडी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

धायरी परिसरात दहिवाळ यांचे ‘श्री ज्वेलर्स’ हे सराफी दुकान आहे. त्यांनी सुवर्ण भिशी योजना सुरू केली होती. या योजनेत अनेकांनी आकर्षक परताव्याच्या अपेक्षेने गुंतवणूक केली. तक्रारदार आणि त्याच्या पत्नीने मिळून तीन लाख ३९ हजार रुपये गुंतवले. चार तोळ्यांचे गंठण घेण्यासाठी ही रक्कम दिली होती. यामध्ये एका जुन्या गंठणाचे मोडीतून आलेले एक लाख रुपये रोख रक्कम आणि ऑनलाइन व्यवहाराचाही समावेश होता. तक्रारदार दांपत्य २५ मे रोजी ज्वेलर्सच्या दुकानात पोहोचले असता, दुकान बंद असल्याचे समजले. चौकशीअंती दहिवाळ दांपत्य पसार झाल्याचे उघड झाले. यानंतर तक्रारदाराने नांदेड सिटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

गुंतवणूकदारांची फसवणूक

पोलिस तपासात ३६ गुंतवणूकदारांनी दहिवाळ यांच्याकडे पैसे आणि सोने गुंतवले असल्याचे समोर आले आहे. दहिवाळ दाम्पत्याने मिळून ४२ लाख ७८ हजार रुपयांची रोकड आणि २१ तोळे सोने घेऊन पलायन केले आहे. पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस, पोलिस निरीक्षक (गुन्हे) गुरूदत्त मोरे पुढील तपास करीत आहेत.

फसवणूक झाल्यास काय कराल?
  • फसवणूक झाल्यास तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार द्या.

  • ऑनलाइन व्यवहाराचे पुरावे, व्यवहाराचे तपशील आणि संबंधित व्यक्तींची माहिती सोबत ठेवा.

  • अशा योजनेत सहभागी होण्यापूर्वी संस्था आणि व्यक्तीच्या पार्श्वभूमीची खातरजमा करा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.