निवडणुकीत ५० टक्के महिलांना निवडून द्या…शरद पवार यांचे आवाहन
GH News June 10, 2025 04:10 PM

मुलींना संधी मिळाल्यानंतर त्यांनी जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम केले. अगदी सैन्य दलातही ते दिसून आले. ऑपरेशन सिंदूरबाबत दोन महिलांनी माहिती देऊन हे सिद्ध केले. भगिनींना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. निवडणुकीत ५० टक्के जागा महिलांना दिली जाणार आहे. दोन-तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. त्यात ५० टक्के महिलांना निवडून द्या, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन कार्यक्रम मंगळवारी पुण्यात झाला. यावेळी शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून पक्षाचे कार्यकर्ते पुण्यात आले होते. शरद पवार म्हणाले, १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. जनतेचा पाठिंबा मिळाला. सामान्य जनतेने संधी दिली. तुमच्या पैकी अनेक जणांना संधी मिळाली. प्रशासन चालवण्यास सामान्य कुटुंबातील व्यक्तीला संधी मिळाली तर तो ही कर्तृत्व दाखवू शकतो. राज्य चालवू शकतो. त्यासाठी अनेकांची नावे घेता येतील. पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाल्यावर त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. त्याचा परिणाम राज्यात सुद्धा झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडेल, असे कधी वाटले नव्हते, अशी खंत व्यक्त करत शरद पवार यांनी देशहिताला पाठिंबा देण्याचा विचार मांडला. ते म्हणाले, देशाचा विचार दोन दृष्टिने केला पाहिजे. देशाचा विचार करताना राष्ट्रवादी कधी राजकारण आणत नाही. पहलगाममध्ये हत्या झाल्यानंतर राष्ट्रवादीने देशहिताची भूमिका घेतली. शेजारी राष्ट्रासोबत आपले संबंध चांगले राहिले नाही. सुसंवादाची परिस्थिती बांगलादेश, श्रीलंका, चीन, पाकिस्तानसोबत  नाही, असे पवार यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी विदेशात देशाचे नेतृत्व करण्याची मला संधी मिळाली. ज्या, ज्या देशांत मी गेले त्या ठिकाणी एकच प्रश्न विचारला जात होता, तुमचा देश महात्मा गांधींचा देश आहे. आम्हाला आजही तुमच्या देशातील पंडित नेहरु यांचे भाषण आठवते. महत्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांच्याबद्दल सर्वच बोलत होते. मोदी यांच्याबद्दलही चांगले बोलले गेले. गैरसमज नसावा, असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले. यश-अपयश सुरुच होते. परंतु त्यामुळे हतबल होण्याची गरज नाही, असे सुळे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.