राजा रघुवंशी याच्या हत्या प्रकरणात सोनम रघुवंशीसह तिचा प्रियकर राज कुशवाह आणि इतर दोन आरोपींना अटक करण्यात आलीय. आता सोनमबाबत मोठ्या वहिनींनी धक्कादायक खुलासा केला आहे. राजाच्या हत्या प्रकरणानंतर कुटुंबाला धक्का बसला. तसंच सोनमने त्याच्या हत्येचा कट आधीपासूनच रचला होता अशी माहिती वहिनीने दिली.
हनीमूनला जायचा प्लॅन होता पण शेवटच्या क्षणी सगळं बदललं. तिकीट ते ठिकाण आणि तारीख हे सगळं सोनमने तिच्या मनानुसार केलं. राजाला दोन दिवस आधीपर्यंत आपण शिलाँगला जायचंय हेसुद्धा माहिती नव्हतं. दोघेही हनीमूनला वेगवेगळे बाहेर पडले. सोनम तिच्या घरातून तर राजा त्याच्या घरातून गेला होता.
सोनमची मोठी वहिनी, विपिन रघुवंशीच्या पत्नीने सांगितलं की, सोनमने ऐनवेळी हनीमूनचा प्लॅन बदलला. लग्नानंतर चारच दिवस सासरी राहिली. १५ मे रोजी पाठवणी झाली आणि १९ मे पर्यंत ती घरात राहिली. २० मे रोजी ती माहेरातूनच शिलाँगला गेली. तिच्या माहेरातूनच हनीमूनसाठी निघाली आणि राजा त्याच्या घरातून गेला होता. ज्येष्ठ महिना सुरू असल्यानं ती सासरी राहिली नाही. अमावस्येनंतर सासरी यायचं आणि नंतर फिरायला जायचा प्लॅन होता. पण सोनमने अचानक योजना बदलली असं तिच्या वहिनीने सांगितलं.
राजाला रविवार सकाळपर्यंत माहिती नव्हतं की, हनीमूनला शिलाँगला जायचंय. रविवारी सायंकाळी सोनमने त्याला मंगळवारी शिलाँगला जायचं असल्याचं सांगितलं. सोनमच्या सांगण्यावरूनच त्याने चेन आणि अंगठी सोबत घेतली होती. हा सगळा तिच्या कटाचा भाग असावा अशी शंका आम्हाला वाटते असंही राजाच्या कुटुंबियांनी म्हटलं.