Vidarbha News : विदर्भात वादळीवाऱ्याचं थैमान, भंडाऱ्यात ४५ फूट उंच बौद्ध मूर्ती कोसळली, यवतमाळात ५० हून अधिक घरांचे नुकसान
esakal June 11, 2025 07:45 AM

विदर्भातील अनेक भागांत वादळीवाऱ्याने थैमान घातले आहे. याचा मोठा फटका नागरिकांना बसला आहे. वादळीवाऱ्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात ५० हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे, तर भंडारा जिल्ह्यात ४५ फूट उंच बौद्ध मूर्ती कोसळली आहे.

भंडारा जिल्ह्यातील पवनी ही नगरी प्राचीन बौद्ध नगरी म्हणून विदर्भात प्रसिद्ध आहे. सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेला पाठवले होते. त्यांच्या प्रवास वर्णनात पवनी शहराचा उल्लेख आहे. चंद्रमणी विहार येथे तथागत गौतम बुद्ध यांचे केस असल्याचे नमूद आहे.

चंद्रमणी विहार समितीने अथक परिश्रम आणि बौद्ध उपासकांच्या सहकार्याने पवनी शहरात ४५ फूट उंच भव्य बौद्ध मूर्तीची स्थापना केली होती. मात्र, आज (१० जून २०२५) सायंकाळी वादळीवाऱ्यामुळे तथागतांची ही मूर्ती कोसळली.

या वादळीवाऱ्यामुळे गावांतील अनेक घरांचे नुकसान झाले. झाडे कोसळल्याने पवनी-लाखांदूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. भंडारा जिल्ह्यात मंगळवारी दुपारनंतर वादळी वारे आणि रिमझिम पाऊस झाला. पवनी तालुक्यातील आसगाव परिसरात वादळाचा जोर अधिक होता. त्यामुळे भेंडाळा, खैरी, दिवाण, मोखारा, वडेगाव येथे घरांवरील टिनपत्रे आणि छत उडाले, ज्यामुळे मोठे नुकसान झाले.

याशिवाय, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांनाही वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. चंद्रपूरात मंगळवारी सायंकाळी पाऊस झाला. वादळी पावसामुळे अनेक भागांत झाडे उन्मळून पडली. ताडोबा मार्गावरील पदमापूर-मोहरली रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली, आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या.

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील पारवा आणि आसपासच्या गावांमध्ये सोमवारी संध्याकाळी आलेल्या सुसाट वादळी पावसाने मोठे नुकसान केले. जोरदार वाऱ्यामुळे अनेक घरांचे टिनपत्रे हवेत उडाले, तर काही घरांची पूर्णपणे उघडझाप झाली. सुमारे ५० पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

वादळ इतके प्रचंड होते की, काही गावांमध्ये विजेचे खांब आणि रस्त्यालगतची झाडे मुळासकट उन्मळून पडली. परिणामी, काही भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. पारव्यासह जांब आणि परिसरातील गावांमध्येही हीच परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले. पारवा येथील नायब तहसीलदारांच्या आणि पारवेकर वाड्याच्या घरांचेही या वादळात नुकसान झाले.

या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कुटुंबे उघड्यावर आली असून, त्यांना तात्पुरत्या निवाऱ्याची गरज आहे. स्थानिक प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. नेमके नुकसान किती झाले, याचा अंदाज पंचनाम्यानंतरच स्पष्ट होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.