स्थळ : मातोश्री हाइट्स. वेळ : रात्रीची निजानीज टाइम.
चि. विक्रमादित्य : (खोलीच्या दारावर टकटक करत) हाय देअर, बॅब्स…मे आय कम इन?
उधोजीसाहेब : (पांघरुणात शिरत) छे…ही काय वेळ झाली? आता उद्या!! गुड नाईट!!
विक्रमादित्य : (दार ढकलून बिनदिक्कत आत येत) कमॉन, बॅब्स…रात्र वैऱ्याची आहे! झोपू नका!!
उधोजीसाहेब : (पांघरुण घेत) वैऱ्याची रात्र असेल तर झोपलेलंच बरं! उगाच कशाला जागायचं? तूसुद्धा दूध पिऊन झोप!!
विक्रमादित्य : (परिस्थितीची जाणीव करुन देत) राजकारणात बरीच उलथापालथ होतेय! शत्रू एकवटतोय!! घड्याळवाले आणि तुतारीवाले एकत्र येऊन आपला बँड वाजवणार असं दिसतंय!! आपण जागे राहायला नको?
उधोजीसाहेब : (कडवटपणाने) सगळ्यांना एकदम मनोमीलनाची आस लागली आहे!!
विक्रमादित्य : (चुकीची दुरुस्ती करत) मनोमीलनाची प्यास म्हणायचं आहे का तुम्हाला? आस म्हंजे इंग्रजीत…
उधोजीसाहेब : (अजीजीनं) जाऊ दे ते आता! मनोमीलनाच्या गप्पा मारण्याची ही वेळ नाही! रात्र वैऱ्याची आहे, शत्रू एकवटतोय असं आत्ताच म्हणालास ना?
विक्रमादित्य : (त्वेषानं) मी कित्तीही गोड मुलगा असलो तरी शत्रूसाठी अत्यंत कडवट आहे! ऐसा लंबे करीन की यंव रे यंव!!
उधोजीसाहेब : (बिनधास्तपणे) शाब्बास माझ्या वाघा! पण कुठला शत्रू? कोण शत्रू? कसला शत्रू? तू झोपायला जा बघू!!
विक्रमादित्य : (डोळे बारीक करुन) आपणही मनोमीलनाचा कार्यक्रम लौकरात लौकर करुन टाकला पाहिजे!
उधोजीसाहेब : (पांघरुणाच्या आतून) कुठलं मनोमीलन? कसलं मनोमीलन? कोणाचं मनोमीलन? तू झोप!!
विक्रमादित्य : (चक्रावून) हे काय विचारणं झालं? आख्खा महाराष्ट्र ज्या मनोमीलनाची वाट पाहतोय, तेच!!
उधोजीसाहेब : (कंटाळून) किती उतावळेपणा कराल रे!!
विक्रमादित्य : (उत्साहाच्या भरात) शिवाजीपार्कवाल्या काकांशी आपलं पुन्हा जुळायला हवं! जुळवायचं का?
उधोजीसाहेब : (गंभीरपणाने) काही निर्णय माझ्यावर सोडा! टाळी कधी द्यायची हे मी ठरवीन!!
विक्रमादित्य : (घाई करत) सगळ्यांच्या आधी आपण मनोमीलन केलं तर इतरांच्या मनोमीलनातली हवा निघून जाईल! आपण लग्गेच करुन टाकू या! मी कळवतो, शिवाजी पार्कच्या काकांना!! व्हिजिटिंग सून युअर शिवाजी पार्क कॅफे!! चालेल?
उधोजीसाहेब : (डोळ्यांमधली झोप आवरत) काऽऽय?
विक्रमादित्य : (चुटकी वाजवत) हेच की आम्ही येत्या रविवारी जेवायला येतो म्हणून!! त्यांच्याकडे मुंबईतला बेस्ट मेन्यू आहे, असं मी ऐकलंय!!
उधोजीसाहेब : (पांघरुण फेकत) छे, छे, भलतंच काहीतरी नको!!
विक्रमादित्य : (हट्टानं) कमॉन बॅब्स…सगळे त्यांच्याकडे जेवून गेले, आपल्याला साधा वडापावसुद्धा मिळाला नाही! ते काही नाही, आपण त्यांच्याकडे जेवायला जायचं म्हंजे जायचंच!!
उधोजीसाहेब : (समजूत घालत) जाऊ, जाऊ, एक दिवस जाऊ! पावसाळ्याचे दिवस आहेत, बाहेरचं खाऊ नये, या दिवसात!!
विक्रमादित्य : (आणखी हट्ट करत) कित्ती लोक जातात! संजयकाकासुद्धा शिवाजी पार्कच्या कॅफेत जाऊन येतो, असं म्हणाले आहेत!
उधोजीसाहेब : (भिवई वर चढवत) तुला रे काय ठाऊक?
विक्रमादित्य : मलाच ‘सुट्टे आहेत का रे’ असं विचारत होते...!
उधोजीसाहेब : (निक्षून सांगत) कोणीही कुठेही जायचं नाही! तू दुसऱ्या कुठल्या तरी बऱ्या हॉटेलात जाऊन जेवून ये, हवं तर!!
विक्रमादित्य : (हताश होत्साता) कमॉन, मग आपलं मनोमीलन होणार कसं?
उधोजीसाहेब : (खांद्यावर हात टाकत) त्यांनी इथं यावं! बंद दाराआड मी त्यांनाही माझी स्वप्न सांगणार आहे!! कळलं?