राज्य महामार्गात जमिन गेली पण त्याचा पुरेसा मोबदला न मिळाल्यानं एका शेतकऱ्यानं थेट रस्त्यावरच भिंत बांधल्याची घटना घडलीय. यामुळे वाहतूक वळवण्याची वेळ वाहतूक पोलिसांवर आली. हरियाणात कुरुक्षेत्रातील पहोवा इथं घडलीय. बलविंदर सिंह असं शेतकऱ्याचं नाव असून कुटुंबाने राज्य महामार्गावर भिंत बांधण्यास सुरुवात केलीय. कोर्टाने १२ वर्षांपूर्वी जमीन किंवा नुकसानभरपाई शेतकऱ्याला द्यावी असे आदेश सरकारला दिले होते. पण अद्याप मोबदला मिळाला नसल्यानं शेतकऱ्यानं हे पाऊल उचललं.
महामार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी बलविंदर सिंह यांनी सांगितलं की तुम्हाला पुढे जायचं असेल तर शेतातून जा. मोठ्या संख्येनं दुचाकी आणि इतर वाहनं शेतातून पुढे गेली. मात्र मोठी वाहनं राज्य महामार्गावर उभा राहिल्यानं ट्राफिक जाम झालं. आता यावर वाहतूक पोलिसांना डोक्याला हात लावण्याची वेळ आलीय.
शेतकऱ्यानं महामार्गावर भिंत बांधल्याची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बलविंदर सिंह यांच्यासह कुटुंबाला समजावून सागंण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण बलविंदर सिंह यांनी म्हटलं की जमीन आमची आहे आणि सरकारने मोबदला द्यावा. असं नाही झालं तर आम्ही आमची जमीन ताब्यात घेऊ. दरम्यान, पोलिसांनी पहोवा पोलीस ठाण्यात बलविंदर सिंह यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एसडीओंनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तक्रारीत म्हटलं की, जिल्हा प्रशासनाला कोणतीही माहिती न देता रस्ता बंद करण्यात आला. यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. याशिवाय अनेकदा विनंती करूनही रस्ता मोकळा केला नाही.
बलविंदर सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी अटकेची कारवाई केलेली नाही. बलविंदर सिंह आणि त्यांच्या कुटुंबाची जमीन रस्त्यासाठी २०१० मध्ये संपादित करण्यात आली. यानंतर बलविंदर सिंह यांनी कोर्टात धाव घेत जमीन द्या किंवा मोबदला द्या अशी मागणी केली होती. कोर्टाने याबाबत सरकारला नुकसान भरपाई देण्याचे आदेश २०१३ मध्ये दिले होते. मात्र अद्याप सरकारने निर्णय न घेतल्यानं संतापलेल्या बलविंदर सिंह यांनी थेट रस्त्यावरच भिंत बांधली.