मुंबई : गेल्या काही दिवसापासून मुंबईसह उपनगर आणि ठाणे परिसरात काही प्रमाणात तुरळक पाऊस झाल्याचे समोर आले आहे. अशामध्ये काही भागांमध्ये पावसाने दडी मारली असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. पण आगामी काही दिवस हवामान खात्याने मुंबईसह उपनगर आणि ठाणे परिसरात वादळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. तर, कोकण परिसरामध्येही सारखीच परिस्थिती असणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे बुधवारी (11 जून) मुंबई आणि उपनगरात हवामान ढगाळ आणि दमट राहण्याची शक्यता आहे. तसेच, या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. (Rain Update for Mumbai Thane and Kokan region IMD alert in state)
हेही वाचा : BMC : दांडीबहाद्दर सफाई कर्मचारी आता रडारवर, 45 दिवसांपेक्षा जास्त दांड्या मारल्यास होणार कारवाई
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ठाण्यासह कोकणात शुक्रवार 12 जूनपासून ते 17 जूनपर्यंत मुसळधार वादळी पावसाची शक्यता आहे. यामध्ये नदीकाठच्या गावांना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. कोकणामध्ये मुसळधार पावसामुळे नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहण्याचाही धोका हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच नद्यांना पूर येऊन नागरी जीवनही विस्कळीत होऊ शकते, असा इशारा दिला आहे. घाटरस्त्यांमध्ये ढगाळ वातावरणामुळे दृश्यमान्यताही कमी होऊ शकते. तसेच मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी दरड कोसळण्याचाही धोकाही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
मुंबईसह ठाण्यामध्ये कोसळणाऱ्या पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये 13 आणि 14 जून रोजी ताशी 45 ते 55 किमीपर्यंत वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे वादळी पावसापासून सावध रहावे, असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. किनाऱ्यालगतच्या गावांना धोका असल्याचेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. यंदा मान्सून 26 मे रोजी कोकणात दाखल झाला. भारतीय हवामान खात्याने 2025 च्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा 106 टक्के जास्त पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस झालेला नाही. मागील 3 ते 4 दिवस या भागातील तापमान 40 अंश सेल्सिअसहून अधिक आहे. राज्यात मंगळवारी (10 जून) सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे झाली. यावेळी 43.4 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. राज्यासह देशातही पावसाने दडी मारली आहे. राजस्थान, जोधपुर या काही भागात सध्या उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती आहे.