अकोला : शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारण्याचा सरकारचा कधीही विचार नव्हता. त्यांना योग्य वेळी आणि योग्य प्रकारे कर्जमाफी दिली जाईल, असे स्पष्ट आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी आज अकोल्यात दिले. अकोला व वाशीम जिल्ह्यांच्या संयुक्त विकास आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार संजय खोडके, अमोल मिटकरी, किरण सरनाईक तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्र्यांनी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बी-बियाणे, खतांची उपलब्धता व पीककर्ज वाटप यांचा सविस्तर आढावा घेतला. राज्यात बी-बियाण्यांचा पुरेसा साठा आहे. मात्र, डीएपी खताची काहीशी टंचाई भासत आहे. त्या संदर्भात मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आले असून कृषी विभागाला तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
खत आणि बियाण्यांच्या वितरणात लिंकिंग केल्याच्या तक्रारी काही भागांतून आल्याच्या पार्श्वभूमीवर पवार म्हणाले, ‘‘जर कुठे खत व बियाण्यांच्या वितरणात लिंकिंग केले जात असेल, तर नागरिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांची लूट खपवून घेतली जाणार नाही,’’ असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यात यंदा १० कोटी झाडे लावणारराज्यात यंदा १० कोटी वृक्षारोपणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. पुढील वर्षापासून हे उद्दिष्ट २५ कोटी इतके असेल. त्याचप्रमाणे, कॅम्पाअंतर्गत तीन हजार कोटींचा निधी असून, त्यातून व्यापक कामे राबवली जातील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.