अहमदाबाद विमान अपघात
Marathi June 15, 2025 04:24 AM

लोखंड वितळले, भगवद्गीता सुरक्षित

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळल्याच्या घटनेनंतर बचावकार्य जवळपास समाप्त झाले आहे. या भीषण दुर्घटनेत विमानातील केवळ एका प्रवाशाचा जीव वाचला आहे. बचावकार्यादरम्यान स्फोटानंतर आगीच्या ज्वाळांनी विमान अन् परिसराला कशाप्रकारे नुकसान पोहोचविले हे स्पष्टपणे दिसून आले. याचदरम्यान बचावपथकाला एक भगवद्गीता मिळाली आहे. बहुधा एखादा प्रवासी या पवित्र ग्रंधाला स्वत:सोबत राखून अहमदाबाद ते लंडनपर्यंतचा प्रवास करत असावा. एकीकडे सर्व सामग्री जळून खाक झाली, तर भगवद्गीता पूर्णपणे सुरक्षित अन् वाचण्यायोग्य स्थितीत होती. तेथे उपस्थित लोक या घटनेकडे एक चमत्कार म्हणून पाहत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक व्यक्ती दुर्घटनास्थळी ढिगाऱ्यांमधून भगवद्गीतेची प्रत दाखविताना दिसून येत आहे. ढिगाऱ्यात पूर्णपण जळालेल्या विमानांच्या हिस्स्यांदरम्यान भगवद्गीता सुरक्षित आढळणे केवळ चमत्कार मानला जात आहे, तसेच हे लोकांच्या श्रद्धेचा प्रतीक ठरले आहे. याचदरम्यान लंडन येथील एका हिंदू मंदिरात सुमारे 100 लोकांनी एकत्र येत मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तसेच पीडित परिवारांसाठी प्रार्थना केली आहे. शोकाच्या या क्षणी प्रार्थनाच सर्वात मोठा आधार आहे. ही वेळ सामूहिक संवेदना न् आत्मचिंतनाची असल्याचे योगविवेकदास स्वामी यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले आहे.

ब्रिटन पाठविणार तपास पथक

अहमदाबाद विमान दुर्घटनेवरून ब्रिटन आणि अमेरिकेने तपासात सहकार्य करण्याचा प्रस्ताव दिला आहे. आम्ही एक तपास पथक त्वरित भारतासाठी रवाना करत आहोत, असे ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी म्हटले आहे. तर ब्रिटनच्या एअर अॅक्सिडेंट्स इन्व्हेस्टिगेशन ब्रँचने (एएआयबी) भारताच्या विमान दुर्घटना तपास ब्युरोला औपचारिक स्वरुपात सहकार्याचा प्रस्ताव दिला असल्याचे सांगत या तपासात तांत्रिक सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भारतात सुरू असलेल्या तपासात सहकार्यासाठी एक बहु-विषयक तपास पथक पाठवत आहोत. हे पाऊल आंतरराष्ट्रीय नागरीउ•ाण संघटनेच्या (आयसीएओ) अनुच्छेद 13 अंतर्गत उचलण्यात आले आहे, कारण विमानात ब्रिटिश नागरिक सवार होते. आमच्या संवेदना या दु:खद घटनेने प्रभावित सर्व लोकांसोबत असल्याचे एएआयबीने म्हटले आहे.

या दु:खद घटनेच्या संबंधी ब्रिटनकडून जारी समर्थनाच्या अंतर्गत एएआयबी भारतात तपासात सहकार्यासाठी एक पथक पाठविणार आहे. मी सातत्याने घडामोडींवर नजर ठेवून आहे आणि माझ्या संवेदना सर्व पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत असल्याचे उद्गार ब्रिटनचे परिवहन मंत्री हाइडी अलेक्जेंडर यांनी काढले आहेत.

ब्रिटिश उच्चायोग देखील अॅक्शनमध्ये

ब्रिटिश उच्चायोगाने भारतातील स्थानिक प्रशासनासोबत मिळून स्थितीची माहिती जमविणे आणि प्रभावितांना सहाय्य प्रदान करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. एफसीडीओने ब्रिटिश नागरिकांना कौन्स्युलर सहाय्यासाठी हेल्पलाईन क्रमांकही जारी केला आहे.

अमेरिकन एफएएकडून मदतीचा प्रस्ताव

अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन एजेन्सीने (एफएए) भारतात घडलेल्या दुर्घटनेच्या तपासात तांत्रिक सहकार्य करण्यास तयार असल्याचे म्हणत नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डासोबत (एनटीएसबी) मिळून एक पथक पाठविण्यास तत्पर असल्याचे नमूद केले आहे. एखादी आंतरराष्ट्रीय विमान दुर्घटना घडल्यावर त्या देशाचे सरकार चौकशीचे नेतृत्व करते, सहकार्य मागण्यात आल्यास एनटीएसबी अमेरिकेकडून अधिकृत प्रतिनिधी असते आणि एफएए तांत्रिक समर्थन प्रदान करते. आम्ही एनटीएसबीच्या समन्वयाने टीम पाठविण्यास तयार आहोत असे एफएएने म्हटले आहे.

भारताकडून चौकशीला प्रारंभ

अहमदाबाद येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर आंतरराष्ट्रीय नागरीउ•ाण संघटनेकडून (आयसीएओ) निर्धारित आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलच्या अनुरुप विमान दुर्घटना तपास ब्युरोकडून औपचारिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. याचबरोबर सरकार  याप्रकरणाच्या विस्तृत चौकशीसाठी विविध विषयांचे तज्ञ सामील असलेली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करणार आहे. समिती विमानो•ाण सुरक्षेला मजबूत करणे आणि भविष्यात अशा दुर्घटना रोखण्याचे काम करणार आहे. गंभीर दुर्घटनांच्या स्थितीत एफ फील्ड टीम घटनास्थळी पाठविण्यात येते, जी ब्लॅक बॉक्स (फ्लाईट डाटा रिकॉर्डर), कॉकपिट व्हॉईस रिकॉर्डर इत्यादींची तपासणी करते. अशा प्रकरणांमध्ये सरासरी स्वरुपात प्रारंभिक अहवाल तीन महिन्यांच्या आत जारी केला जात असतो.

घातपात नसावा, दुर्घटनाच असावी : डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांचे 'हॉलिवूड डिफेन्स'

अहमदाबाद विमान दुर्घटनेवरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वक्तव्य समोर आले आहे. अहमदाबाद येथे भयानक दुर्घटना घडली आहे. याप्रकरणी जे काही करता येईल ते आम्ही करणार आहोत. भारत एक मजबूत देश असून तो स्थिती सांभाळून घेईल. या दुर्घटनेमागे घातपात असल्याचे वाटत नाही. केवळ इंजिनची शक्ती कमी झाल्याचे वाटत असल्याचे उद्गार ट्रम्प यांनी काढले आहेत.

दुर्घटना भयानक होती. यात बहुतांश लोक मृत्युमुखी पडली आहेत. प्रत्यक्षात काही लोक वाचले आहेत असे मी आताच ऐकले आहे. याप्रकरणी आम्ही मदतीसाठी पावले उचलणार आहोत, त्यासंबंधी लवकरच घोषणा केली जाईल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. विमानात दुर्घटनेपूर्वी विस्फोट झाल्याचे वाटत नाही. ही विमानो•ाणाच्या इतिहासातील सर्वात भयानक दुर्घटना होती असेही त्यांनी म्हटले आहे.

अयोध्येचा वैद्यकीय विद्यार्थी गंभीर जखमी, दुर्घटनेपूर्वी मेसमध्ये करत होता जेवण

गुजरातच्या अहमदाबामध्ये विमान वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या मेसच्या इमारतीवर कोसळले होते. या दुर्घटनेत वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अक्षत बीजे हा गंभीर जखमी झाला आहे. तो एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. दुर्घटनेवेळी तो मेसमध्ये सहकाऱ्यांसोबत जेवण करत होता. त्याचवेळी एअर इंडियाचे विमान त्या इमारतीवर कोसळले. अक्षतचे हात, पाय अन् डोक्याला गंभीर ईजा झाली आहे.अक्षत हा अयोध्या शहराच्या देवकाली येथील भिखापूरचा रहिवासी आहे. दुर्घटनेनंतर त्याचे वडिल राजेश जायसवाल आणि अन्य कुटुंबीय अहमदाबादसाठी रवाना झाले आहेत. अक्षत हा अत्यंत हुशार विद्यार्थी असून तो अहमदाबादमध्ये एमबीबीएस करत असल्याचे त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितले. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या लोकांच्या कुटुंबीयांसाठी आम्ही संवेदना व्यक्त करतो. रामलल्लाने स्वत:च्या चरणांमध्ये सर्वांना स्थान द्यावे अन् जे जखमी आहेत, त्यांना लवकर बरे करावे असे अक्षतच्या शेजाऱ्यांनी म्हटले आहे.

1.25 लाख लिटर इंधन, 1000 अंश तापमान ,विमान दुर्घटनेत श्वान-पक्ष्यांनाही गमावला जीव

अहमदाबादमध्ये विमान कोसळल्यावर दुर्घटनास्थळी तापमान इतके अधिक होते, की बचावकार्य करणे जवळपास अशक्य ठरले होते अशी माहिती समोर आली आहे. विमानात 1.25 लाख लिटर इंधन भरलेले होते, जे दुर्घटनेनंतर भीषण आगीत रुपांतरित झाले आणि तापमान 1000 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. टेकऑफच्या काही मिनिटांनीच हे विमान अहमदाबादच्या बीजे मेडिकल कॉलेजचे हॉस्टेल आणि नागरी वस्तींवर कोसळले होते. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) पथक गुरुवारी दुपारी 2-2.30 च्या दरम्यान घटनास्थळी पोहोचले. त्यापूर्वी काही स्थानिक लोकांनी काही जणांना बाहेर काढले, परंतु बचावपथकाला कुणीच जिवंत मिळाला नव्हता. विमानाच्या टँकमध्ये विस्फोट झाल्याने आग भडकत तापमान त्वरित 1000 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. अशा तापमानात कुणीच वाचू शकत नव्हता असे एका वरिष्ठ अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले आहे.

असे दृश्य पूर्वी पाहिले नव्हते

2017 पासून आपत्ती व्यवस्थापनात आहे, परंतु इतकी भयानक स्थिती पूर्वी कधीच पाहिली नाही. आम्ही पीपीई किट परिधान केले होते, परंतु उष्णत इतकी प्रचंड हाती की संचालक अत्यंत अवघड ठरले. सर्वत्र जळणारे अवशेष होते. आम्ही 25-30 मृतदेह बाहेर काढले ज्यात मुलांचे मृतदेह देखील सामील होते. मृतदेहांची ओळख डीएनए परीक्षणानेच शक्य होईल, असे एका एसडीआरएफ कर्मचाऱ्याने सांगितले आहे.

प्राणी, पक्ष्यांनीही गमावला जीव

प्राणी आणि पक्ष्यांनाही या दुर्घटनेपासून वाचण्याची संधी मिळाली नाही. घटनास्थळी श्वान अन् पक्ष्यांचे मृत शरीर आढळून आले आहेत.

विमान दुर्घटनेसंबंधी आक्षेपार्ह पोस्ट अंगलट, केरळच्या सरकारी कर्मचाऱ्याचे निलंबन

केरळमधील एका सरकारी कर्मचाऱ्याला फेसबुकवर केरळच्या एका नर्सविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करण्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. या नर्सचा अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झाला होता. कासरगोड जिल्ह्याच्या वेल्लारीकुंडु तालुका कार्यालयात कनिष्ठ अधीक्षक ए. पवित्रन यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आल.s पवित्रन यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पथनमथिट्टा येथील नर्स रंजीता यांची थट्टा करणारी पोस्ट केली होती. पवित्रन यांची फेसबुक पोस्टमधील टिप्पणी अपमानास्पद आहे. हा मुद्दा समोर येताच त्वरित निलंबनाच आदेश जारी करण्यात आल्याची माहिती केरळचे महसूल मंत्री के. राजन यांनी दिली आहे.

ब्रिटनमध्ये करत होती काम

दोन मुलांची आई रंजीता ही ब्रिटनमध्ये नर्स म्हणून काम करत होती.  विदेशात काही काळ घालविल्यावर पुन्हा शासकीय सेवेत सामील होण्याच्या योजनेसह स्वत:च्या नोकरीशी संबंधित औपचारिकता पूर्ण करण्यासाठी रंजीता या चार दिवसांकरता केरळमध्ये आल्या होत्या. तर दुर्घटनेनंतर राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी पथनमथिट्टा जिल्ह्याच्या पुल्लाड येथे रंजीता यांच्या घरी जात त्यांच्या शोकाकुल परिवाराचे सांत्वन केले आहे.

उदित राज यांची पोस्ट, काँग्रेस संतप्त

अहमदाबाद विमान दुर्घटनेप्रकरणी डीजीसीएला लक्ष्य करत काँग्रेस नेते उदित राज यांनी एक्सवर एक पोस्ट केली होती. परंतु त्यांच्या या सोशल मीडिया पोस्टमध्ये काँग्रेस नेतृत्व संतप्त झाले आहे. अशास्थितीत उदित राज यांना स्वत:ची पोस्ट डिलिट करावी लागली आहे.

संबंधित पोस्ट डिलिट करण्याचा निर्देश काँग्रेसने उदित राज यांना दिला होता. उदित राज यानी अहमदाबाद विमान दुर्घटनेला डीजीसीएमधील भ्रष्टाचार अन् भेदभावाशी जोडले होते. डीजीसीएमध्ये भ्रष्टाचार अन् पक्षपातो एअर इंडिया दुर्घटनेसारख्या संकटाला जन्म दिला असू शकतो. रविंदर सिंह जम्वाल यांना 2021मध्ये डीजीसीए संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले होते आणि आता ते फ्लाइट स्टँडर्ड्स संचालनालय (एफएसडी) तसेच एअर स्पेस आणि एअर नेव्हिगेशन सर्व्हिसेस स्टँडर्ड्सचे प्रमुख आहेत असे उदित राज यांनी म्हटले आहे.

जम्वाल यांच्या शैक्षणिक पात्रतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सिक्कीम सरकारच्या उच्चशिक्षण संचालनायाने जम्वाल यांनी मिळविलेली फिजिक्समधील पदव्युत्तर पदवी ही युजीसीकडून मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाची नसल्याची पुष्टी दिली आहे. तरीही जम्वाल विरोधात कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याचा दावा उदित राज यांनी केला आहे.

जम्वाल सध्या उड्डाण सुरक्षेशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळत आहेत, त्यांनी खोटी पदवी मिळविल्याचे उघड झाल्यावरही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. अशा व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदविला जाणे आवश्यक होते असे उदित राज यांनी स्वत:च्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.