रोखठोक – ‘मुंबई’च्या निमित्ताने मदाऱ्यांचा खेळ!
Marathi June 15, 2025 10:25 AM

मुंबई, महाराष्ट्र आणि देशात लोक किड्या-मुंग्यांसारखे मरत आहेत. राजकारणी अश्रू ढाळण्याचे ढोंग करतात व पुन्हा राजकीय कामाला सुरुवात करतात. मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने राजकारण व मदाऱ्यांचा खेळ सुरू झाला आहे. मराठी माणूस मुंबईत संपवला जातोय याची चर्चा कोणी करत नाही. मुख्यमंत्री फडणवीसांच्या चर्चेत आणि विचारात मराठी माणूस असण्याची शक्यता नाही. कारण त्यांनी मुंबई गौतम अदानी यांना आंदण दिली आहे.

राज्यकर्ते कोणीही असोत, सामान्य माणसे किड्या-मुंग्यांसारखी मरतच आहेत व राजकारणी तेवढ्यापुरते अश्रू ढाळण्याचे ढोंग करतात. मुंबईत चालत्या लोकलमधून 13 प्रवासी पडले. त्यातले चार जण मरण पावले. राजकारण्यांनी खोटे अश्रू ढाळले व पुन्हा राजकारण करायला मोकळे झाले. कश्मीर खोऱ्यात पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात 26 मायभगिनींच्या कपाळावरचे कुंकू पुसले गेले. बंगळुरूत एका क्रिकेट टीमचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी हजारो लोक जमा झाले. त्या गर्दीत इतकी चेंगराचेंगरी झाली की, त्यात 11 लोकांना प्राण गमवावे लागले. मणिपुरात पुन्हा हिंसाचार उफाळला व त्यात नव्याने लोक बळी पडत आहेत. या भयंकर चित्राने 11 वर्षे राज्य करणारे मोदी जराही विचलित होत नाहीत. ते निर्विकार चेहऱ्याने सत्तेच्या खुर्चीवर विराजमान आहेत. फक्त कश्मीरातील पहलगाम येथील हल्ल्यातच नव्हे, तर बंगळुरू, मुंबई, मणिपुरातील घटनांतही मृत्यूच झाले व तेथेही कुणाचे तरी कुंकूच पुसले गेले, पण सरकारला त्याचे काय! सरकार राजकारण व त्यातून पैसा गोळा करण्यात गुंतले आहे. मुंबईपासून झारखंड, छत्तीसगढच्या जंगलापर्यंत सरकारचे लोक ठेकेदार, उद्योगपतींकडून पैसा जमा करीत आहेत.

संवेदना उरल्या नाहीत

सरकारला आता कोणत्याही संवेदना उरलेल्या नाहीत. सरकार ही संस्था निर्दय आणि कोणताही परिणाम न होणारी अशी असते. मुंबई महापालिकेची लढाई आता सुरू आहे. चार वर्षे मुंबई पालिकेवर लोकप्रतिनिधींचे राज्य नाही. मुख्यमंत्र्यांना ‘रिपोर्टिंग’ करणारा प्रशासक तेथे आहे. या काळात कमिशनबाजीतून 34 हजार कोटी रुपये संबंधितांच्या खासगी तिजोरीत गेले. यातला किती वाटा फडणवीस व किती शिंदे यांना मिळाला तो आकडा समजला म्हणजे जनता राज्यकर्त्यांच्या कर्तबगारीवर फुले उधळायला मोकळी. मुंबईतून 34 हजारांवर कोटींची कमाई केली. महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे कोणती महानगरपालिका किती कोटींना लुटली हे समजून घेणे रंजक आहे. या देशात जो काळा पैसा निर्माण होतो त्याचे प्रमुख केंद्र मुंबई आहे. दर तासाला देशात पावणेदोनशे कोटी रुपयांचा काळा पैसा निर्माण होतो. तो सर्व 365 दिवस होतो. त्यात मुंबईचा वाटा सर्वाधिक आहे. आता तर भाजपने गौतम अदानी यांची वरातच मुंबईत आणली व त्यांना संपूर्ण मुंबई आंदण दिली. अदानी त्यांच्या लुटीचा वाटा या राज्यकर्त्यांना देणार. त्यामुळे सगळेच खूश. या पैशांची पूजा करण्यासाठी गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात महाराष्ट्राचे मंत्री जातील. हे पाहिले की वाटते भारताचे, खास करून महाराष्ट्राचे राजकारण हे आता मतदारांवर अवलंबून नाही. ते सरकारचे लाडके उद्योगपती, ज्योतिषी, तंत्र-मंत्र विद्यांचा वापर करणारे ठरवतात. महाराष्ट्रात एकमेकांविरुद्ध तंत्र-मंत्र वापरले जातात, जे राघोबादादांनी त्या काळात केले. थोरले माधवराव पेशवे यांना मृत्यू यावा म्हणून राघोबांनी अघोरी उपाय केले, तर आनंदीबाई जप करीत बसल्या होत्या.

सर्वत्र लूट

प्रशासकाच्या काळात मुंबई महानगरपालिकेची लूट झाली. धारावी विकासाच्या नावाखाली गौतम अदानी यांना मुंबईतील अनेक मोक्याचे भूखंड फडणवीस यांनी दिले. धारावीचा भूखंड माहीम, माटुंगा, दादरच्या जवळ आहे. त्याशिवाय कुर्ला डेअरी, दहिसर टोल नाका, मुलुंड डम्पिंग ग्राऊंड, मिठागरे अशा जमिनींचा मलिदादेखील धारावी विकासाच्या नावाखाली अदानी यांना दिला जात आहे. ही महाराष्ट्राची लूट आहे व ती उघडपणे सुरू आहे. या सर्व व्यवहारांत भाजप, फडणवीस, शिंदे, अमित शहा यांना किती मलिदा मिळणार आहे? ही सरळ लाचखोरी आहे. महाराष्ट्राच्या उद्योग आणि गृहनिर्माण क्षेत्रांत व विभागांत आज सर्वाधिक भ्रष्टाचार सुरू आहे. झोपडपट्टी पुनर्विकासाची एकही फाईल पैसे दिल्याशिवाय सरकत नाही. मंत्रालयापासून ते एसआरएपर्यंत हेच प्रकार सुरू आहेत. गरीबांच्या घरांसाठी सुरू केलेल्या योजना बिल्डर आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पकडीत अडकल्या. त्यामुळे मुंबईतून मराठी माणूस बाहेर पडला. त्याचे दुःख सगळ्यांना व्हायला हवे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस व राज ठाकरे हे गुरुवारी सकाळी वांद्र्याच्या ‘ताज’ हॉटेलात भेटले. दोघांत मराठी माणसांच्या भविष्याबद्दल चर्चा झाली असावी, पण ती एकतर्फीच असावी. श्री. फडणवीस हे मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करू पाहणाऱ्या गौतम अदानींचे उघड समर्थक आहेत. फडणवीस काळात मुंबईच्या सर्व जमिनी अदानी यांना दिल्या. मुंबईला भिकारी करून सर्व माल गुजरातला नेण्याचा हा डाव आहे काय? असा प्रश्न राज ठाकरे यांनी फडणवीस भेटीत विचारला असावा अशी आशा आहे. मोदी व शहा यांना हवे तेच फडणवीस करणार व अमित शहा हे मुंबईकडे व्यापार म्हणून बघतात. फडणवीस-राज ठाकरे भेटीत काय चर्चा झाली याची इत्थंभूत माहिती माझ्याकडे आहे. फडणवीस हे एकाच वेळी सगळ्यांना खेळवू पाहतात. महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष आपल्या तालावर चालतो व नेते त्याच तालावर नाचतात असे त्यांना वाटते. महाराष्ट्रात सध्या मदाऱ्यांचा खेळ सुरू आहे इतकेच.

अडाण्यांची लोकशाही

भारतीय लोकशाही ही निरक्षरांची लोकशाही आहे, तरी ती शहाणी आहे असे समाधान मानणे म्हणजे दारात बांधलेल्या प्राण्यांनाही किती उत्तम समजूत आहे असे म्हणण्यासारखे आहे. वृत्तवाहिन्यांच्या एकांगी प्रचाराने जेथे अंधभक्त बनलेले सुशिक्षित प्राणी माना डोलावतात तेथे निरक्षरांचे काय? त्यात ‘खोट्या डिग्री’चे शिक्षण असलेले पंतप्रधान लाभले की, विचारायची सोय नाही. इंदिरा गांधी दूरदर्शनवर दिसल्या की, पूर्वी महिलावर्ग श्रद्धेने हात जोडीत. आता श्री. मोदी दिसले की जोडतात, असे मी भाजपच्या लोकांकडून ऐकले आहे. सुशिक्षित असूनही अज्ञानी असा एक मोठा वर्ग समाजात असतो. तो वर्ग अर्धवट वाचत असतो, काहीतरी चुकीचे ऐकत असतो व त्यावर मत ठरवून काहीतरी बोलत असतो. अशा सर्वांनी मिळून भारतीय लोकशाहीचा शिळा वडापाव केला आहे व त्याचे देशातील अंधभक्तांना कौतुक आहे. प्रे. ट्रम्प यांनी दबाव टाकून पाकिस्तानविरुद्धची लढाई भारताला थांबवायला सांगितली. ही लढाई जमिनीसाठी नव्हती, तर भारतीय हद्दीत पाकिस्तानने केलेल्या दहशतवादाविरुद्ध होती. प्रे. ट्रम्प यांनी ती थांबवली. विरोधी पक्षांनी यावर टोकदार प्रश्न विचारू नयेत म्हणून मोदी यांनी सर्वपक्षीय खासदारांना जगभ्रमणासाठी पाठवले व भारतात शांतता प्रस्थापित केली. परदेशातून आलेल्या सर्व खासदारांना मोदी यांनी मंगळवारी संध्याकाळी दिल्लीत चहापानास बोलावले. तेथे नक्की काय चर्चा झाली ते बाहेर आले नाही, पण ‘पंतप्रधान मोदी यांनी सौ. सुप्रिया सुळेंकडे शरद पवार यांच्या प्रकृतीची खास चौकशी केली’ एवढे वृत्त मात्र बाहेर आले. हे गमतीशीर आहे. मोदी हे पवारांना थेट फोन करून त्यांच्या प्रकृतीची सहज चौकशी करू शकतात, पण त्यांनी चौकशी सुप्रिया सुळेंकडे केली. या खासदारांपैकी एकानेही “प्रे. ट्रम्प यांनी भारतावर दबाव आणून पाकिस्तानबरोबरचे युद्ध का थांबवले? तुम्ही दबावाखाली का झुकलात?” असे सडेतोड प्रश्न विचारले नाहीत. लोकशाहीवादी भारताच्या पंतप्रधानांना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. मोदी यांना पंतप्रधानपदी येऊन 11 वर्षे झाली. 11 वर्षांत ते एकदाही पत्रकार परिषदेला सामोरे गेले नाहीत. हा एक विश्वविक्रम आहे.

प्रे. ट्रम्प यांच्या भारतातील हस्तक्षेपावर मोदी चूप आहेत. चीनने पाकिस्तानला मदत केली. त्यावरही ते बोलत नाहीत. इतके मौन तर मनमोहन सिंग यांनीही पाळले नव्हते. भारतावर राज्य करण्याचे नैतिक बळ श्री. मोदी यांनी गमावले आहे.

भारताची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर इतकी अवहेलना कधीच झाली नव्हती, तेवढी मोदींच्या अमृतकाळात झाली. तरीही मोदी व त्यांचे भक्त खूश असतील तर देशाच्या अधःपतनाचे हे शेवटचे टोक आहे.

ट्विटर – @Rautsanjay61

जीमेल- rautsanjay61@gmail.com

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.