पुणे : राज्यात मॉन्सूनचा पाऊस सक्रिय होऊ लागला आहे. उद्या (ता. १६) कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात पाऊस वाढणार असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात मुसळधारेची शक्यता असल्याने सावधगिरीचा इशारा (रेड अलर्ट), कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. बंगालच्या उपसागरातही समुद्र सपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. आज सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ४०.४ अंश, तर अमरावती येथे ४० अंश तापमानाची नोंद झाली. कोकण, घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे उच्चांकी २५० मिलिमीटर, सिंधुदुर्गातील कणकवली येथे १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.
उद्या (ता. १६) रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा आहे. मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक घाटमाथा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत जोरदार पावसाची, उर्वरित विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सवधानतेचा इशारा देण्यात आला आहे.