Education Crisis : दोन लाख आदिवासी विद्यार्थी गणवेशापासून वंचित; शाळांमध्ये आजपासून प्रवेशोत्सव; विलंबामुळे पालकांमध्ये नाराजी
esakal June 16, 2025 10:45 AM

नाशिक : नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला राज्यभरातील शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा होत असताना, आदिवासी विकास विभागांतर्गतच्या आश्रमशाळांमधील सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित राहावे लागले आहे. गणवेश वितरणात झालेल्या विलंबामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी पसरली असून, गणवेश नेमके केव्हा मिळणार, याबाबत प्रशासनाकडून स्पष्टता देण्यात आलेली नाही.

राज्यात आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत एकूण ४९७ आदिवासी आश्रमशाळा आहेत. या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत २ लाख ४ हजार ४५८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याशिवाय, विभागाकडे ४९० शासकीय वसतिगृहे असून, त्यांची एकूण प्रवेश क्षमता ५८ हजार इतकी आहे. या आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश आणि इतर सुविधा पुरवण्याची जबाबदारी आदिवासी विकास विभागाची आहे. मात्र, यंदा गणवेश वितरणाच्या प्रक्रियेत मोठी अडचण निर्माण झाली आहे.

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी गणवेश हा केवळ कपड्यांचा प्रश्न नसून, त्यांच्या आत्मसन्मानाचा आणि शालेय वातावरणाशी एकरूप होण्याचा भाग आहे. शाळेच्या पहिल्या दिवसापासून गणवेश परिधान करून शिक्षणाचा प्रारंभ करणे, हे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करते. मात्र, गणवेश न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांना जुने किंवा खराब झालेले कपडे घालून शाळेत यावे लागते. याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवरही होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. गणवेश वितरणातील विलंबाचे कारण काय, याबाबत प्रशासनाकडून ठोस माहिती मिळालेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, पुरवठादारांशी संबंधित काही तांत्रिक अडचणी आणि निधी वितरणातील विलंब यामुळे ही समस्या उद्भवली आहे. यापूर्वीही आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागले आहे. यंदाच्या विलंबाने मात्र पालक आणि शिक्षकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, गणवेश वितरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल.

११५ कोटींची निविदा

विद्यार्थ्यांना दोन गणवेशासह इतर शैक्षणिक पूरक साहित्य पुरविण्यासाठी आदिवासी विकास विभागाने ११५ कोटींची निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यात सहभागी पुरवठादारांची ‘प्री-बीड’ बैठक झालेली असली तरी या प्रक्रियेविषयी आक्षेप घेतल्याने ही प्रक्रिया रखडली आहे. त्यातून मार्ग निघेपर्यंत विद्यार्थ्यांना वाट बघावी लागेल.

गणवेशासह इतर साहित्य खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण होताच विद्यार्थ्यांना गणवेश दिले जातील. साधारणत: एक महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

-संतोष ठुबे, शिक्षण सहआयुक्त, आदिवासी विकास विभाग,नाशिक

राज्यातील शाळांमध्ये आजपासून किलबिलाट

मुंबई ः विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळांमध्ये आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. एप्रिल महिन्यानंतर प्रथमच राज्यातील शाळांमध्ये मुलांचा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रत्येक शाळेत ‘शाळा प्रवेशोत्वस’ आयोजित केला आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह शालेय शिक्षणमंत्री विविध शाळांमध्ये हजेरी लावणार आहेत.

शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पालघर जिल्ह्यातील दुर्वेस येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या किसन नगर येथील महापालिका शाळा क्रमांक २३, उपमुख्यमंत्री अजित पवार हे काटेवाडीतील जिल्हा परिषद शाळा आणि बीडच्या जरेवाडीतील जिल्हा परिषद शाळा, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे बागलाण तालुक्यातील तुंगण येथील जिल्हा परिषद शाळा, तर शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे वर्ध्याच्या करंजी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.