नवी दिल्ली : जातिनिहाय जनगणनेच्या प्रक्रियेला उद्यापासून (ता. १६) सुरुवात होणार आहे. उद्या जनगणनेची अधिसूचना प्रसिद्ध होईल. गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिल्लीत गृहसचिव, नोंदणी महासंचालक आणि जनगणना आयुक्त यांच्यासह गृह खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जनगणना प्रक्रियेच्या तयारीचा आढावा घेतला.
ही जनगणना दोन टप्प्यांत केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात, घर यादीकरण आणि घरांची गणना होणार आहे. या टप्प्यात, प्रत्येक कुटुंबाच्या निवासस्थितीबद्दल, मालमत्तेबद्दल व सोयीसुविधांबद्दल माहिती गोळा केली जाईल. तर, दुसरा टप्पा जनगणनेचा असेल. यात प्रत्येक घरात वास्तव्यास असलेल्या प्रत्येक व्यक्तीची लोकसांख्यिकीय, सामाजिक-आर्थिक, सांस्कृतिक व इतर माहिती संकलित केली जाईल. यावेळी जातिनिहाय गणनाही केली जाणार आहे.
जनगणनेच्या कामासाठी सुमारे ३४ लाख प्रगणक आणि पर्यवेक्षक तसेच सुमारे १.३ लाख जनगणना अधिकारी नियुक्त केले जातील. ही १६ वी जनगणना असून, भारताच्या स्वातंत्र्यानंतरची ही आठवी जनगणना असल्याचे गृह खात्याने म्हटले आहे
दरम्यान, आगामी जनगणना मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे. नागरिकांना स्व-गणनेची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल. डेटा संग्रहण, प्रसारण व साठवणूक करताना माहिती सुरक्षेची हमी देण्यासाठी अत्यंत काटेकोर उपाययोजना केल्या जाणार आहेत. या सर्व प्रक्रियेचा आजच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आढावा घेतला.