उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ
esakal June 17, 2025 12:45 AM

उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ
नागरिकांना सतर्कतेचा इशारा; चौपाटीच्या पायऱ्या पाण्याखाली
बदलापूर, ता. १६ (बातमीदार) : रायगड जिल्हा व बदलापूर शहरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या जलप्रवाहात वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील चौपाटीच्या पायऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत; मात्र याच पाण्यात मासेमारीसाठी हौशी नागरिकांची नदीवर गर्दी पाहायला मिळत आहे. त्यात नव्या पुलाचे खांब अर्ध्याहून जास्त पाण्याखाली गेले आहेत.

रात्रीपासून शहरात चांगलाच पाऊस कोसळत आहे. सोमवारी (ता. १६) दुपारपर्यंत अंबरनाथ तालुक्यात १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. बदलापुरात पावसाची नोंद कमी असली तरी कर्जत तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. उल्हास नदीचा प्रवाह हा कर्जत तालुक्यातून शहरात येत असल्याने नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. नदीवरील चौपाटीच्या पायऱ्यादेखील पाण्याखाली गेल्या आहेत. मॉन्सून आता सक्रिय झाला असल्याने चांगला पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे असाच पाऊस सुरू राहिला तर उल्हास नदी धोक्याची पातळी गाठेल, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नदीलगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे; मात्र उल्हास नदीला पाणी वाढल्याने मासेमारीचा आनंद घेण्यासाठी अनेक हौशी नागरिकांची वर्दळ नदीवर पाहायला मिळत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.