मान्सूननं जवळपास सर्व महाराष्ट्र व्यापला, कोणत्या जिल्ह्यात काय अलर्ट आहेत?
BBC Marathi June 17, 2025 12:45 AM
Getty Images प्रातिनिधिक फोटो

मान्सूननं आता महाराष्ट्रातला बहुतांश भाग व्यापला असून गेल्या चोवीस तासांत विशेषतः कोकण आणि घाट प्रदेशात जोरदार पाऊस झाला आहे.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी 16 जून रोजी आगेकूच केली. मान्सूननं विदर्भाच्या उत्तरेकडचा भाग वगळता सर्व महाराष्ट्र व्यापला आहे, असं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं आहे.

सध्या मान्सूनची उत्तरेकडेची सीमा गुजरातमधील वेरावळपासून वडोदरा, खारगाव, अमरावती, दुर्ग, बारगड, चांदबाली, सँडहेड बेट आणि बालुरघाट इथून जातेय.

पुढच्या दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्राला पूर्णतः व्यापेल आणि मध्य व पूर्व भारतातही आगेकूच करेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

या कालावधीत मान्सून सक्रिय स्थितीत असून या कालावधीत काही ठिकाणी जोरदार पावसाचीही शक्यता आहे.

IMD मान्सूनची 16 जून 2025 रोजीची स्थिती

16-17 जूनदरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची आणि तुरळक ठिकाणी अतीवृष्टीची शक्यता आहे.

उत्तर कोकणात तसंच मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

तर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

त्यानंतरचे तीन दिवसही विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

IMD पुढील पाच दिवसांसाठी हवामानाचा अंदाज

दरम्यान, मान्सून पुढे सरकताच महाराष्ट्रातील तापमानावरही त्याचा परिणाम झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गेल्या चोवीस तासांत किमान तापमानातही घट झाली आहे.

मान्सूनचं वेळेआधी आगमन का झालं?

यंदा मान्सून 26 मे रोजी म्हणजे नेहमीपेक्षा तब्बल 16 दिवस आधीच मुंबईत दाखल झाला होता. 75 वर्षांत पहिल्यांदाच मान्सून एवढ्या लवकर मुंबईत दाखल झाला.

केरळमध्येही तो 24 जूनला म्हणजे नेहमीपेक्षा 8 दिवस आधी दाखल झाला.

भारताच्या मुख्य भूमीवर मान्सून वेळेपूर्वी दाखल होण्याची ही 2009 नंतरची पहिलीच वेळ ठरली. 2009 मध्ये मान्सून 23 मे रोजी भारताच्या मुख्य भूमीवर दाखल झाला होता.

यावेळी मान्सून लवकर तर आलाच आहे पण अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचा प्रवासही वेगाने झाला.

या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनलाही गती मिळाली आणि तो वेळेआधी महाराष्ट्रात दाखल झाला.

29 मे नंतर मान्सूननं थोडी विश्रांती घेतली. 16 जून पर्यंत त्याच्या स्थितीत कोणताही बदल झाला नव्हता. आता मोसमी वारे पुन्हा सक्रिय होऊन आगेकूच करत आहेत.

2025 मध्ये मान्सून कसा असेल? महाराष्ट्रात किती पाऊस पडेल?

यंदा मान्सूनच्या काळात महाराष्ट्रासह भारतात बहुतांश ठिकाणी असा अंदाज भारतीय हवामानतज्ज्ञांनी वर्तवला होता.

2025 या वर्षी आगामी मान्सूनसाठीचा पहिला दीर्घकालीन अंदाज भारतीय हवामान विभागानं जारी केला होता.

त्यानुसार देशात दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 105 टक्के पावसाची शक्यता आहे. लडाख, तामिळनाडू आणि ईशान्य भारत वगळता इतर राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल.

IMD

महाराष्ट्रात कोकणातला किनारी भाग, मराठवाड्याचा काही भाग तसंच विदर्भातील काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता बरीच जास्त आहे.

तर राज्यात इतर बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, असंही हवामान विभागानं दिलेल्या नकशातून दिसून येतं.

मान्सून हा शब्द कुठून आला? मान्सूनचे दोन प्रकार कोणते?

काही भाषातज्ज्ञांच्या मते, मान्सून या शब्दाचं मूळ अरबी भाषेतल्या मौसीम या शब्दात आहे. मौसीम म्हणजे मोसमी वारे किंवा ऋतूनुसार वाहणारे वारे.

दक्षिण आशियात ठराविक काळात मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. इतका की त्या काळाला पावसाळ्याचा ऋतू म्हणून इथे स्वतंत्र ओळख मिळाली आहे.

याच मोसमी वाऱ्यांसाठी मान्सून हा शब्द ब्रिटिशकालीन भारतात वापरला जाऊ लागला.

Getty Images माळशेज घाटात जमलेलेे मान्सूनचे ढग

भारतात जून ते सप्टेंबर या काळात वारे नैऋत्य दिशेकडून म्हणजे साधारण अरबी समुद्राकडून हिमालयाकडे वाहतात. या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे किंवा नैऋत्य मान्सून (साऊथ-वेस्ट मान्सून) म्हणून ओळखतात.

तर ऑक्टोबर महिन्यात वारे याच्या उलट दिशेने म्हणजे ईशान्येकडून वाहतात. त्यांना ईशान्य मोसमी वारे किंवा ईशान्य मान्सून (नॉर्थ वेस्ट मान्सून) म्हणतात. या वाऱ्यांमुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात प्रामुख्यानं दक्षिण भारतात पाऊस पडतो.

मान्सून ऑनसेट म्हणजे काय?

फक्त पाऊस आला, म्हणजे मान्सूनची सुरुवात झाली, असं नसतं. तर एखाद्या ठिकाणी विशिष्ठ कालावधीतील पाहून हवामान विभागाचे तज्ज्ञ त्या ठिकाणी मान्सून ऑनसेट झाल्याचं म्हणजे मान्सूनची सुरूवात झाल्याचं जाहीर करतात.

केरळ आणि लक्षद्वीपमधल्या 14 ठराविक हवामान केंद्रांपैकी किमान 60 टक्के म्हणजे 9 केंद्रांवर ठिकाणी 10 मे नंतर कधीही सलग दोन दिवस 2.5 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली, तर तिथे मान्सून दाखल झाल्याचं हवामान विभाग जाहीर करतो.

दरवर्षी अंदमान-निकोबारमध्ये साधारणपणे 20 मे पर्यंत मान्सून ऑनसेट होतो, म्हणजे मान्सून दाखल होतो. 1 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होतो आणि 7 ते 11 जूनपर्यंत मुंबईत पोहोचतो.

नैऋत्य मान्सूनच्या दोन शाखा आहेत – एक अरबी समुद्रातली आणि दुसरी बंगालच्या उपसागरातली.

भारताच्या मुख्य भूमीवर नैऋत्य मान्सूनचा काळ साधारण 1 जून ते 30 सप्टेंबरदरम्यानचा आहे. तर ईशान्य मान्सून साधारण 20 ऑक्टोबरच्या आसपास सक्रीय होतो.

मान्सून कुठे तयार होतो?

मान्सूनची निर्मिती कशामुळे होते, याविषयी काही सिद्धांत आहेत.

पृथ्वी 21 अंशांमध्ये कलली आहे. त्यामुळे तिचा उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेला असतो. परिणामी उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो, तेव्हा दक्षिण गोलार्धात थंडी असते.

जास्त तापमान असतं तिथे हवेचा दाब कमी तर कमी तापमानाच्या ठिकाणी हवेचा दाब जास्त असतो. वारे नेहमी जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात.

जमिनीपेक्षा समुद्राचं तापमान थोडं थंड असतं, त्यावेळी समुद्राकडून वारे वाहू लागतात. येताना हे वारे समुद्रावरचं बाष्प आणतात, त्यातून पाऊस पडतो.

पण हे असं चित्र पृथ्वीच्या इतर अनेक ठिकाणी होतं. मात्र भारतीय उपखंडातली स्थिती थोडी खास बनवते.

BBC Weather अरबी समुद्राकडून भारतीय द्वीपकल्पाकडे वाहणारे वारे

भारतीय द्वीपकल्पाचा आकार मोठा असून उन्हाळ्याच्या दिवसांत इथलं तापमान वेगानं खूप वाढतं आणि जमीनही तापते. विशेषतः मे महिन्या पर्यंत राजस्थानच्या वाळवंटात उष्णता वाढते. त्याच वेळी अरबी समुद्राच्या आसपासच्या प्रदेशात म्हणजे आफ्रिका, सौदी अरेबियन द्वीपकल्प यांचं तापमानही वाढतं.

परिणामी हिंदी महासागरातून उत्तर गोलार्धात आलेले वारे भारतीय द्वीपकल्पाकडे वाहू लागतात. या वाऱ्यांसोबत मोठ्या प्रमाणात बाष्पही येतं. त्यातून ढगांची निर्मिती होते आणि पाऊस पडतो.

ऑक्टोबर उजाडेपर्यंत तापमान आणि वाऱ्यांच्या दिशेचं गणित बदलतं, वारे ईशान्येकडून वाहू लागतात.

मान्सूनमुळे किती पाऊस पडतो?

भारतात साधारण 80 टक्के पाऊस हा नैऋत्य मान्सूनमुळे पडतो तर साधारण 11% पाऊस ईशान्य मान्सूनमुळे पडतो असं हवामान खात्याच्या नोंदी सांगतात.

भारतात जून ते सप्टेंबर या काळात सरासरी 87 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो.

मान्सून का महत्त्वाचा?

जून- सप्टेंबर या मान्सूनच्या काळात साधारणपणे वर्षभरातील 70 टक्के पाऊस पडतो. यामुळे शेतीसोबतच, नद्या, धरणं, तलाव, विहिरी भरण्यासाठी मान्सून महत्त्वाचा ठरतो.

Getty Images भारतातली शेेती मान्सूवरच अवलंबून आहे.

मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसामुळे तीव्र उष्णतेपासून सुटका होते. पण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनंही मान्सून महत्त्वाचा आहे. दक्षिण आशियातल्या अर्थव्यवस्था त्यावर अवलंबून आहेत.

भारतासारख्या शेतीप्रधान देशात आजही अनेक गणितं पावसावर अवलंबून असतात. एका रिपोर्टनुसार भारतातील जवळपास अर्धी शेती ही मान्सूनवरच्या पावसावर अवलंबून आहे.

मान्सून ही लाइफलाईन मानली जाते. कमी किंवा जास्त पावसानं शेतीचं नुकसान होतं.

1925 मध्येे ब्रिटनच्या रॉयल कममिशन ऑन अॅग्रिल्चर इन इंडियानं एका अहवालात असल्याचं म्हटलं होतं. शंभर वर्षांनंतरही परिस्थिती बदललेली नाही.

एल निनो, ला निना आणि मान्सून

एल-निनो आणि ला-निना ही पॅसिफिक महासागरातल्या सागरी प्रवाहांच्या विशिष्ट स्थितींची नावं आहेत.

पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढते आणि ते गरम पाणी पश्चिमेला आशियाकडे सरकते, तेव्हा त्या स्थितीला ‘एल-निनो’ असं संबोधलं जातं. ला निना ही त्याउलट स्थिती आहे.

या एल निनो आणि ला निना प्रवाहांचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतातल्या मान्सूनवरही परिणाम होताना दिसतो. साधारणपणे पडताना दिसतो.

BBC

पण फक्त एकट्या एल निनोमुळे मान्सूनवर परिणाम होत नाही. तर एल निनोसारखाच हिंदी महासागरात इंडियन ओशन डायपोल अर्थात IOD हा प्रवाहही महत्त्वाचा ठरतो.

IOD सकारात्मक असतो, म्हणजे पश्चिम हिंदी महासागराचं तापमान पूर्वेपेक्षा जास्त असतं, तेव्हा ती स्थिती भारतात मान्सूनला पोषक ठरताना दिसते.

त्याशिवाय जेट स्ट्रीम या वातावरणाच्या वरच्या थरातील हवेच्या प्रवाहाचाही मान्सूनवर परिणाम होतो.

मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज असा वर्तवला जातो

मान्सूनचा अंदाज वर्तवण्यासाठी काही प्रमुख गोष्टींचा आधार घेतला जातो. त्यातल्या तीन गोष्टी आहेत :

1. इंडियन ओशन डायपोल (IOD) म्हणजेच हिंदी महासागरातील द्विध्रुव. अर्थात या महासागराच्या पूर्व आण पश्चिम भागांतील पाण्याचं असमान तापमान.

IOD सकारात्मक असतो, म्हणजे पश्चिम हिंदी महासागराचं तापमान पूर्वेपेक्षा जास्त असतं, तेव्हा ती स्थिती भारतात मान्सूनला पोषक ठरताना दिसते.

2. एल निनो सदर्न ऑसिलेशन (ENSO) म्हणजे पॅसिफिक महासागरातील .

पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढते आणि ते गरम पाणी पश्चिमेला आशियाकडे सरकते, तेव्हा त्या स्थितीला 'एल-निनो' असं संबोधलं जातं. ला निना ही त्याउलट स्थिती आहे.

या एल निनो आणि ला निना प्रवाहांचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतातल्या मान्सूनवरही परिणाम होताना दिसतो. साधारणपणे भारतात एल निनोच्या काळात कमी तर ला निनाच्या काळात जास्त पाऊस पडताना दिसतो.

3. उत्तर गोलार्धात हिवाळा आणि वसंत ऋतूत झालेला हिमवर्षाव कमी असतो, तेव्हा त्या वर्षी मान्सूनच्या काळात भारतात पाऊस सहसा जास्त पडतो.

4. जेट स्ट्रीम या वातावरणाच्या वरच्या थरातील हवेच्या प्रवाहाचाही मान्सूनवर, विशेषतः मान्सूनच्या आगमनावर परिणाम होतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.