भारताचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेचा विषय ठरतात. यापूर्वी त्यांनी बऱ्याचदा भारताचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार एमएस धोनीवरही जोरदार टीका केली आहे. त्यांनी अनेकदा विराट कोहलीवरही टीका केली आहे.
आता पुन्हा एकदा त्यांनी कर्णधारपदावर निशाणा साधला आहे. याशिवाय त्यांनी माजी निवडकर्ते मोहिंदर अमरनाथ यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. २०११ नंतर कमीतकमी ७ जणांच करियर उद्ध्वस्त केल्याचे त्यांनी म्हटलंय.
इनसाईड स्पोर्टसोबत बोलताना योगराज म्हणाले, ' निवडकर्त्यांनी या खेळाडूंचे कोणतेही कारण नसताना करियर उद्ध्वस्त केले. गौतम गंभीर, युवराज सिंग, हरभजन सिंग, झहीर खान, मोहम्मद कैफ, व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड असे खेळाडू. त्यांना तुम्ही २०११ नंतर जाऊन दिले. तुम्ही २०११ वर्ल्ड कपनंतर संपूर्ण संघच उद्ध्वस्त केला. ७ खेळाडूंची करियर तुम्ही कुंडीत टाकलं. म्हणून आपण संघर्ष करत आहोत.'
२०११ वर्ल्ड कपनंतर भारताला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दौऱ्यांमध्ये कसोटी मालिकेत ४-० असे पराभूत व्हावे लागले होते. त्यावेळी मोहिंदर अमरनाथ निवड समितीचे अध्यक्ष होते. त्या पराभवानंतर हळुहळू गंभीर, झहीर, हरभजन, युवराज यांच्या कारकिर्दीचाही शेवट झाला होता. द्रविड आणि लक्ष्मणने नंतर दीर्घकाळाच्या कसोटी कारकिर्दीला अलविदा केले होते.
योगराज म्हणाले, 'आपण धोनीच्या नेतृत्वात ५ मालिका पराभूत झालो होतो आणि त्याला कर्णधार म्हणून बदलण्यात येईल, असं मोहिंदर अमरनाथ यांनी सांगितलं होतं. पण या गोष्टी करण्याची ही योग्य पद्धत नाही.'
दरम्यान, अमरनाथ यांनी नंतर खुलासा केला होता की ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यात मिलालेल्या व्हाईटवॉशनंतर धोनीला कर्णधारपदावरून हटवण्यात येणार होते, पण तत्कालिन बीसीसीआय अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी या निर्णयाला विरोध केला होता.
दरम्यान, नंतर धोनीने २०१४ च्या अखेरीसपर्यंत कसोटी संघाचे नेतृत्व केले. त्याच्या निवृत्तीनंतर २०१५ च्या सुरुवातीला विराट कोहलीने कसोटीत भारताचे नेतृत्व केले. धोनी २०१७ पर्यंत वनडे आणि टी२० संघाचाही कर्णधार होता. त्यानंतर वनडे आणि टी२०मध्येही विराटने नेतृत्वाची जबाबदारी घेतली.