सिनिअर टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला 20 जूनपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या दरम्यान अंडर 19 टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. मात्र अंडर 19 टीम इंडियाला त्याआधी मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचे 2 खेळाडू दुखापतीमुळे या दौऱ्यातून बाहेर झाले आहेत. बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली आहे. तसेच बीसीसीआयने त्या दोघांच्या जागी इतर खेळाडूंचा संघात समावेश केला आहे. अंडर 19 टीम इंडिया 24 जून ते 23 जुलै दरम्यान 1 वनडे वॉर्म अप मॅच, 5 यूथ वनडे आणि 2 मल्टी डे मॅचेस खेळणार आहे. अंडर 19 टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी मराठमोळ्या आयुष म्हात्रे याच्याकडे आहे.
आदित्य राणा आणि खिलन पटेल या दोघांना दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्याला मुकावं लागलं आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, आदित्य राणा याला पाठीतील खालच्या भागात फ्रॅक्चर झालं आहे. तर खिलनला उजव्या पायाला त्रास जाणवत आहे. या दोघांना बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेन्समधील हाय परफॉर्मन्स कॅम्प दरम्यान ही दुखापत झाली.
त्यामुळे बीसीसीआयने आदित्य राणा आणि खिलन पटेल या दोघांच्या जागी संघात डी दीपेश आणि नमन पुष्पक यांचा समावेश केला आहे.दीपेश आणि नमन हे दोघे आधी राखीव खेळाडूंच्या यादीत होते. मात्र त्यांना आता मुख्य संघात संधी देण्यात आली आहे.
आयपीएलच्या 18 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्सकडून मुंबई इंडियन्स विरुद्ध घरच्या अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये पदार्पण करणाऱ्या 17 वर्षीय आयुष म्हात्रे याच्याकडे अंडर 19 संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तसेच 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी याचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. वैभवने आयपीएल 2025 मध्ये झंझावाती शतकी खेळी केली होती. या दोघांच्या कामगिरीकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
इंग्लंड दौऱ्यातून दोघे दुखापतीमुळे बाहेर
इंग्लंड दौऱ्यासाठी अंडर 19 सुधारित टीम इंडिया : आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्याराजसिंह चावडा, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (उपकर्णधार आणि विकेटकीपर), हरवंश सिंह (विकेटकीपर), आर एस अंबरीश, कनिष्क चौहान, हेनिल पटेल, युधाजीत गुहा, प्रणव राघवेंद्र, मोहम्मद एनान, अनमोलजीत सिंह, डी दीपेश आणि नमन पुष्पक.