Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेतील ९९ मृतदेहांची ओळख पटवण्यात यंत्रणांना यश आलं आहे. तर उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा मृतदेह देखील सापडला असून तो त्यांच्या कुटुंबियांकडं सोपवण्यात आला आहे. दरम्यान, तपास अधिकाऱ्यांना कॉकपिट व्हाइस रिकॉर्डर ब्लॅक बॉक्स सापडला आहे. या घटनेचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला फ्लाइट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) सापडला होता. पण आता दोन्ही रिकार्डर सापडल्याने अधिकाऱ्यांना तपास करण्यात मदत मिळणार आहे.
९९ मृतदेहांची ओळख पटलीएअर इंडिया विमान अपघातानंतर चार दिवसांनी २७० पैकी आतापर्यंत ९९ जणांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटविण्यात आली असून त्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्यासह ६४ मृतदेह संबंधितांच्या नातेवाइकांना सुपूर्द करण्यात आले. विजय रूपानी यांचे पार्थिव शासकीय रुग्णालयात त्यांची पत्नी अंजली रूपानी आणि कुटुंबातील अन्य सदस्यांकडं सुपूर्द करण्यात आलं. मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी युद्ध पातळीवर डीएनए चाचणीचे काम सुरू आहे.
विमानात स्फोट झाल्यानं अनेकांचा होरपळून मृत्यू झाला तर काही जणांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न स्थितीत सापडले. त्यामुळं डीएनए चाचणी करणे गरजेची झाली. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राकेश जोशी म्हणाले, "आतापर्यंत ९९ जणांचे डीएनए नमुने जुळले असून ६४ मृतदेहांना अगोदरच संबंधित कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. मृत गुजरात आणि राजस्थानच्या विविध भागातील रहिवासी होत. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात असून अनेक जण अजूनही नमुन्याचे अहवाल मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत"
कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरही मिळालाएअर इंडिया विमान दुर्घटनेचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कॉकपिट व्हाइस रिकॉर्डर ब्लॅक बॉक्स सापडल्याचे काल सांगितलं. व्हॉईस रिकाडॅर हे एक महत्त्वाचं उपकरण असून त्यामुळं अपघाताचे कारण समजण्यास मदत मिळणार आहे. या विमान अपघातात २७४ जणांचा मृत्यू झाला आणि यात २४१ प्रवासी होते. केवळ एकाचाच जीव वाचला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव पी. के. मिश्रा यांनी काल अहमदाबादला भेट दिली असता तपास अधिकाऱ्यांनी त्यांना व्हाइस रिकॉर्डकर ब्लॅक बॉक्स पाडल्याची माहिती दिली. त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूसही केली.
पत्रकारांशी बोलताना मिश्रा म्हणाले, "विमान अपघाताची घटना दुर्दैवी असून या घटनेने अतीव दु:ख झाले आहे. पीडित लोकांचे दु:ख कमी करणे आणि त्यांच्या भावना जाणून घेणे आपले कर्तव्य आहे. यादरम्यान गांधीनगर येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत त्यांनी वेगाने डीएनए चाचणी करणे आणि अचूकतेवर भर देण्याचं आवाहन केलं. यानंतर सर्किट हाउस येथे त्यांनी एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. यात त्यांनी केंद्र, राज्य सरकार, विमान अपघात तपास पथक (एएआयबी) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत बचाव आणि तपास कार्याची माहिती घेतली. तसेच अपघातग्रस्त विमानाची निर्मिती अमेरिकेत झाल्याने अमेरिकी राष्ट्रीय परिवहन संरक्षण मंडळाचे पथक (एनटीएसबी) आंतरराष्ट्रीय निकषानुसार या घटनेचा समांतर चौकशी करत आहे.