सद्गुरू
‘मला विचारांवर नियंत्रण मिळवायचे आहे’ हा स्वतःहूनच एक विचार आहे. एकदा का तुम्ही ‘विचारप्रक्रियेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न’ करायला लागलात, की त्या गोष्टीला अंत नाही. हा एक न संपणारा संघर्ष आहे.
एक मार्ग आहे, तो म्हणजे ईशा योग मार्ग - आहे तसे राहू द्या. त्या गोष्टीची चिंता करू नका. ती गोष्ट स्वतःहून चालू राहू द्या. तुम्ही फक्त त्याबद्दल जागरूक रहा. हळू हळू ती गोष्ट स्वतःची गती गमावते आणि बाजूला पडते. हा एक मार्ग आहे.
दुसरा मार्ग हा आहे, की तुमच्या प्राणावर नियंत्रण मिळवणे. शेवटी, तुमचा विचार असो किंवा हृदय किंवा पेशींची क्रिया, काहीही असो, शरीरात आणि तुमच्या आत जे काही घडते, ते प्रामुख्याने प्राणावर अवलंबून असते. तुम्ही प्राणावर नियंत्रण ठेवले, तर विचार राहत नाही. तुमचे तुमच्या प्राणावर पुरेसे प्रभुत्व असेल, तर तुम्हाला तुमच्या विचारांवर, तुमच्या शरीरावर आणि शरीराच्या सर्व जैविक कार्यांवर प्रभुत्व प्राप्त होते.
तुम्ही तुमची तहान नियंत्रित करण्याचा प्रयत्न करून किंवा स्वतःची भूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न केल्यामुळे विचारप्रक्रियेवर नियंत्रण मिळवता येणार नाही. प्राण नियंत्रणात असतो, फक्त तेव्हाच ते अगदी सहजपणे घडेल. जर तुमचा प्राण नियंत्रणात असेल, तर तुमची विचारप्रक्रिया स्वाभाविकपणे नियंत्रणात येईल. जसजशी ऊर्जेची पातळी वाढत जाते आणि प्रवाह स्थिर होतो आणि त्यावर नियंत्रण येते, तेव्हा तिथे विचार राहत नाही.
बघणे, पाहणे आणि विचार करणे यामध्ये फरक आहे. बघण्यासाठी विचारप्रक्रियेची आवश्यकता नाही. पाहणे म्हणजे केवळ तुमच्या डोळ्यांनी पाहणे असे नाही. डोळे बंद असतानाही तुम्ही पाहू शकता. एकदा का तुम्ही जागरूकता विकसित केली, की तुम्ही विचार न करता पाहायला लागता. तुम्ही पूर्ण जागरूक असता, तेव्हा विचारप्रक्रिया नसते. ज्या क्षणी तुम्ही जागरूक होता, तेव्हा विचार राहत नाही. ज्या क्षणी विचार येतो, तेव्हा साधारणपणे तुमची जागरूकता गेलेली असते; कदाचित एखादी व्यक्ती ध्यानामध्ये विचारप्रक्रियेबद्दल जागरूक असू शकते, परंतु सामान्यपणे तुम्ही जागरूक नसता.
यासाठी अभ्यास आवश्यक आहे. दुर्दैवाने आजच्या जगात अभ्यास कमी आहे, कारण लोक अजूनही असा विचार करतात, की आध्यात्मिकता ही एखादी दुय्यम गोष्ट आहे, जीवन दुसरीकडे कुठेतरी आहे आणि आध्यात्मिकता ही त्याच्या बाजूची गोष्ट आहे. बहुतेक लोकांनी स्वतःचे जीवन अशाच प्रकारे रचले आहे. ते फक्त लहानसहान गोष्टींनी आनंदी होतात. तुम्हाला खरोखर याचा शेवट करायचा असेल, जर तुम्हाला खरोखर हे पाहायचे असेल, की आंतरिक जग किती मोठे आहे, तर त्यासाठी अभ्यास आवश्यक आहे. ते तुमचे सर्वोच्च प्राधान्य असायला हवे. तरच तुमच्यासाठी गोष्टी उलगडायला सुरुवात होते.