शुबमन गिलच्या खांद्यावर कसोटी संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात शुबमन गिलच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. अशा स्थितीत शुबमन गिलच्या विचार करण्याच्या पद्धतीकडे लक्ष लागून आहे. असं असताना माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याने एका मुलाखतीत शुबमन गिलला बुचकळ्यात टाकणारा प्रश्न विचारला. यात गौतम गंभीर की आशीष नेहरा? कोण बेस्ट कोच आहे? कारण आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सचं शुबमन गिल आशिष नेहराच्या प्रशिक्षणासाठी नेतृत्व पार पाडतो. तर कसोटी क्रिकेटमध्ये गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली पहिल्या मालिकेला सामोरं जाणार आहे. त्यामुळे हा प्रश्न शुबमन गिलसाठी गुगली होता. पण शुबमन गिलने या प्रश्नाला सपक उत्तर देत दोन्ही दिग्गजांचा कोचिंगमधील फरक स्पष्ट केला.
शुबमन गिलने दिनेश कार्तिकला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, आशिष नेहरा हा एक अतिशय व्यावहारिक प्रशिक्षक आहे आणि हे त्याच्या प्रशिक्षणातून दिसून येते. त्याला जे काही सांगायचं ते तो सर्वांसमोर थेट बोलतो. दुसरीकडे, गौतम गंभीरबाबत सांगायचं तर खूप लक्ष केंद्रीत करणारा व्यक्ती आहे. त्याला जो काही संदेश द्यायता तो सर्व खेळाडूंना सांगतो. त्याची मानसिकचा आशिष नेहरापेक्षा खूप वेगळी आहे. पण शेवटी प्रत्येकाचं ध्येय एकच आहे. फक्त मार्ग वेगळे आहेत. दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने इंग्लंडविरुद्धची मालिका महत्त्वाची आहे. या मालिकेतील कामगिरीवर पुढचा प्रवास ठरणार आहे. कारण विजयी टक्केवारी कायम ठेवायची तर या मालिकेत चांगली कामगिरी करावीच लागणार आहे.
इंग्लंड विरूद्धच्या मालिकेबाबत शुबमन गिलने मन मोकळं केलं. त्याने या मालिकेआधी सांगितलं की, ‘आमच्या फलंदाजी क्रमात आणि त्यांच्या गोलंदाजी क्रमात अनुभवाची उणीव आहे. म्हणून मी सांगेन की हे संतुलित आहे. आम्ही सर्व खेळाडू प्रत्येक सामन्यात आणि प्रत्येक सत्रात चांगली कामगिरी करू इच्छितो. आम्ही कोणत्याही एका गोलंदाजाकडे पाहत नाही. परिस्थिती समजून घेत सर्वकाही पुढचं ठरवलं जाईल.’